Monday, May 9, 2011

शंकराचार्याचा तोडगा आणि अयोध्येचा गुंता

सुहास पळशीकर (युनिक फीचर्स)

जवळपास गेली दोन दशके रामजन्मभूमीविषयीच्या वादाचा गदारोळ उठला आहे. शंकराचार्यांनी सुचविलेल्या तोडग्याच्या निमित्ताने जाणूनबुजून अशी हवा निर्माण करण्यात आली होती की आता या प्रकरणी समझोता होऊ शकेल. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने शंकराचार्यांचा तोडगा फेटाळून लावल्यामुळे मुस्लिम समाजाला बदनाम करीत दुसरीकडे कट्टरवादी भूमिका घेण्याचा आगखाऊ हिंदुत्ववाद्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात हा तोडगा मान्य होण्यासारखा तर नव्हताच. त्यामध्ये राजकीय व्यवहार आणि न्यायाचे तत्त्व या दोहोंचा अभाव होता.
तसे पाहिले तर रामजन्मभूमीचा वाद प्रदीर्घ काळापासून अनिर्णित आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तो गोठविण्यात आला होता. राजकीय स्वार्थासाठी संघपरिवार आणि भाजप यांनी तो वाद ऐंशीच्या दशकात उकरून काढला. या दरम्यान शंकराचार्यांनी या वादात कधीच फार स्वारस्य दाखविले नाही. नरसिंहराव पंतप्रधान असताना या प्रश्नात शंकराचार्यांचा थोडाबहुत हस्तक्षेप सुरू झाला. भाजप सत्तेवर आल्यापासून (१९९८) गेल्या पाच वर्षांत शंकराचार्यांचा हस्तक्षेप फारसा नव्हताच. आता अचानकपणे एका बाजूला या प्रश्नावर विश्व हिंदू परिषदेची आक्रमक भाषा सुरू झाली असून, दुसरीकडे शंकराचार्यांचा तोडगा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

प्रत्यक्षात शंकराचार्यांच्या प्रस्तावाचा मुख्य गाभा काय आहे? ‘वादग्रस्त जागा‘ आणि वाद नसलेली जागा एकमेकांपासून वेगळ्या करण्यावर त्यांचा भर असून, वाद नसलेल्या जागेवर राममंदिराची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र तरीही वादग्रस्त जागेविषयी नंतर तडजोड व्हावी असे सुचविले आहे. म्हणजे मूळ प्रश्न निकाली निघतच नाही. आता राममंदिर झाल्याचे श्रेय हिंदुत्ववाद्यांना घेता येईल आणि तरीही मुस्लिम समाजावर दबाव आणायला ते मोकळे राहतील असेच या तोडग्याचे स्वरूप आहे. असा तोडगा मान्य होणे अवघडच आहे. काही काळापूर्वी खुद्द केंद्र सरकारनेही वादग्रस्त नसलेल्या (पण ताब्यात घेतलेल्या) जागी पूजा करू द्यावी अशी मागणी न्यायालयात केलीच होती. शंकराचार्यांचा तोडगा हा त्या सूचनेचाच वेगळा अवतार होता. या दोन्ही प्रयत्नांमध्ये एक समान सूत्र म्हणजे मुस्लिम समाजाला काहीच देऊ न करता त्यांच्याकडून मात्र काही देकार मिळविणे हे आहे. असे तोडगे समझोत्याच्या दिशेने नेऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.

शंकराचार्यांच्या हस्तक्षेपाला दुर्दैवाने आणखी एक महत्त्वाचा संदर्भ आहे. पुढील वर्षी येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमीचा वाद पुन्हा एकवार पेटविण्यात येत आहे. संघपरिवार, वाजपेयी, अडवाणी आणि विहिंप हे सुसूत्रपणे मुस्लिमांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करीत आहेत. एकीकडे तोगडियांनी ‘‘हिंदूंना मुस्लिमांच्या सद्‌भावनेची गरज नाही, आम्ही स्वबळावर राममंदिर उभारू‘‘ असे म्हणायचे आणि सिद्धसाधक वाजपेयींनी ‘हा प्रश्न राजकारण्यांना बाजूला ठेवून सोडवला पाहिजे‘, असे सांगत शंकराचार्यांच्या गळ्यात हे झेंगट बांधायचे यात एक संगती आहे. पक्ष म्हणून भाजप दूर राहणार पण मंदिर व्हावे म्हणून शंकराचार्यांना पणाला लावणार असा हा खेळ आहे. जर शंकराचार्यांचा प्रस्ताव मान्य झाला तर मंदिर झाल्याचे श्रेय घेऊन निवडणुकांना सामोरे जायचेआणि तो प्रस्ताव फेटाळला गेला तर मुस्लिमविरोधाचे राजकारण करायचे अशी ही योजना असेल का?

शंकराचार्यांचा प्रस्ताव फेटाळताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिलेली कारणे मात्र पटण्यासारखी नाहीत. सदरहू लॉ बोर्ड मुस्लिम समाजाच्या भावनांपासून किती दुरावलेले आहे हेच त्याच्या प्रतिक्रियेवरून दिसते. शरियाचा आधार घेत प्रस्ताव फेटाळताना लॉ बोर्ड म्हणते की, मशिदीची जागा ही अल्लाची मालमत्ता असते. तिची विक्री किंवा हस्तांतर होऊ शकत नाही. ही भूमिका दोन कारणांसाठी विघातक आहे. एक तर या भूमिकेमुळे सदर प्रश्नी कोणत्याच तोडग्याला अवसर राहात नाही. म्हणजे हा वाद समझोत्याने सोडवायलाच जणू लॉ बोर्डाने नकार दिला आहे. दुसरे म्हणजे या भूमिकेचा अर्थ असा होतो की, अयोध्याप्रश्नी न्यायालयाने जरी रामजन्मभूमीला अनुकूल निर्णय दिला तरी तो निर्णय ‘इस्लामविरोधी‘ ठरवून सामान्य मुसलमानांना भडकविण्याचा मार्ग कर्मठ मुस्लिम नेत्यांना खुला राहील!

हिंदू व मुस्लिम जमातवाद्यांचे नेहमीच एकमत असते असे सांगितले जाते. रामजन्मभूमीच्या प्रश्नावर त्याचेच प्रत्यंतर येत आहे. अयोध्येला राममंदिर होते की नव्हते हा कायद्याचा प्रश्न नसून भावनेचा प्रश्न आहे, असे विहिंप म्हणते तर सदर जागा ही अल्लाची मालमत्ता असल्याने तिची देवाण-घेवाण होऊ शकत नाही, असे लॉ बोर्ड सांगते. म्हणजे दोघांनाही न्यायालयीन मार्ग मान्य नाही असाच निष्कर्ष निघतो! बरे, शंकराचार्यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देताना लॉ बोर्डाने समझोत्याची काही भाषा तरी केली आहे का? तर तसेही दिसत नाही. कोणताही समझोता ‘सर्वांना समान वागणूक‘ आणि ‘अल्पसंख्यांच्या भावनांचा आदर‘ या तत्त्वांवर आधारित असावा असे लॉ बोर्ड सांगते. एकीकडे या आधुनिक तत्त्वांचा आग्रह धरायचा आणि दुसरीकडे आधुनिकपूर्व कारणे देऊन समझोत्याचा रस्ता बंद करायचा यातून काय साधणार आहे? लॉ बोर्डाला मुस्लिमांच्या सुरक्षिततेची काळजी नाही, लॉ बोर्डाला चिंता आहे ती मुस्लिम समाजाला सतत असुरक्षित ठेवून कर्मठ नेतृत्व त्या समाजावर लादण्याची. म्हणूनच चुकीच्या युक्तिवादावर आधारित असा निर्णय त्या मंडळाने घेतला आहे. म्हणजे, कोणताच देकार नसलेला शंकराचार्यांचा प्रस्ताव आणि समझोत्याला वाव न ठेवणारा लॉ बोर्डाचा नकार यांनी अयोध्या प्रश्नाचा गुंता वाढवायला मदतच केली आहे.

अयोध्या प्रश्नाचे विविध स्तर आहेत. वादग्रस्त जागेवर दिवाणी कायद्याच्या आधारे कोणाची ‘मालकी‘ आहे हा त्या प्रश्नाचा एक पदर आहे. वहिवाटीच्या तत्त्वाने व पुराव्यांच्या आधारे हा मुद्दा सोडविता येईलही. पण त्याच्या पलीकडे वादग्रस्त जागी पूर्वी मंदिर होते का हा प्रश्न राहीलच. पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक या दुसर्‍या प्रश्नावर मार्गदर्शन करू शकतात. पण एखादा विषय जेव्हा सार्वजनिक वादाचा विषय बनतो तेव्हा शास्त्रीय संशोधनही त्या वाद क्षेत्राचाच एक घटक बनते. एखाद्या संशोधकाने/ गटाने सदर जागी पूर्वी मंदिर होते/ नव्हते, असे म्हटले की त्याचा धर्म, राजकीय कल, हेतू, यांचा पंचनामा होऊन त्याचे निष्कर्ष संशयास्पद ठरविले जातात. तरीही आपण गेली कित्येक वर्षे या भ्रमात आहोत की, शास्त्रीय उत्खननांमधून ‘पुरावा‘ गोळा करून हा प्रश्न सोडविता येईल.

आता तर न्यायालयीन आदेशानेच उत्खनन चालू असून त्याचा अहवाल यायचा आहे. या उत्खननाचा अहवाल संबंधित वादातील बाजूंनाच काय पण तज्ज्ञांनाही मान्य होईल याची काय शाश्वती आहे? पण आपण सगळेच जण विज्ञानाच्या कल्पित निर्णायक शक्तीचे गुलाम असतो. त्यामुळे सदर विज्ञान शाखेत (पुरातत्त्वशास्त्रात) अनिर्णित, अनिश्चित आणि अन्वयार्थनिष्ठ अभ्यासाचेही क्षेत्र असते याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याहीपुढे जाऊन समजा की, मशिदीच्या जागी मंदिर होते/ नव्हते असे पुरातत्त्वशास्त्रीय आधारावर ‘सिद्ध‘ झाले तरी वादमिटेल का? आताच अशी लक्षणे दिसताहेत की पुरातत्त्व खात्याच्या उत्खननाच्या अहवालातून मंदिर असल्याचा स्पष्ट पुरावा मिळणार नाही पण विश्व हिंदू परिषद त्यामुळे काही भूमिका बदलणार नाही. ‘आम्ही गैरसमजुतीमुळे मुस्लिमांना हैराण केले, मशीद पाडली, पण तिथे मंदिर नव्हतेच. सबब आता हे आंदोलन आम्ही संपवतो,‘ असे तोगडिया किंवा अडवाणी म्हणतील का? किंवा त्याउलट, ‘इथे पूर्वी मंदिर होते हे आम्हाला माहिती नव्हते आता ही जागा आम्ही हिंदूंना सुपूर्द करतो‘, असे लॉ बोर्ड किंवा बाबरी कृती समिती म्हणेल का?

सारांश, दिवाणी कायदा किंवा पुरातत्त्वशास्त्र यांच्या आधारे समझोता घडून येणे दुरापास्त आहे. समझोत्याचा आणखी एक मार्ग म्हणजे लवाद नेमण्याचा. काही काळापूर्वी असा प्रस्ताव माजी मुख्य निवडणूक आयुक्त कृष्णमूर्ती यांनी मांडला होता. वादात गुंतलेल्यांनी आपापले प्रतिनिधी व एक संयुक्त प्रतिनिधी लवादावर नेमावेत व लवादाने ठराविक काळात निर्णय द्यावा आणि तो न्यायालयात नोंदवून संबंधितांनी मान्य करावा, असा त्या प्रस्तावाचा आशय होता. त्याऐवजी आता शंकराचार्यांनी थेट एक प्रस्ताव दिला व तो फेटाळण्यात आला आहे, असे बिगर राजकीय प्रस्ताव फेटाळले जाणार हे स्वाभाविकच आहे. कारण गेल्या दोन दशकांत अयोध्या प्रश्न हा राजकीय वादाचा प्रश्न बनला असून त्याचा उपायही राजकीय मार्गानेच शोधावा लागणार आहे.

अयोध्येच्या बाबरी मशिदीबद्दल खरोखरीच वाद आहे का? सामान्य हिंदू व सामान्य मुसलमान यांची गेले दोन दशकभर अशी समजूत करून दिली जात आहे की, हा ‘रामजन्मभूमी‘विषयीचा वाद आहे. पण मग मधूनच त्यात काशी-मथुरेचा मुद्दा कोठून येतो? भारतभरातल्या तीनशे मशिदींचा मुद्दा कोठून येतो? भारतातील मुसलमान राष्ट्रवादी आहेत की नाहीत याचा प्रश्न कोठून येतो? हिंदूंच्या धार्मिक भावनेचा हा प्रश्न असेल तर त्यात राष्ट्रवादाच्या मुद्याची सरमिसळ का केली जाते?आणि तो जर ‘राष्ट्रीय आत्मसन्मानाचा‘ मुद्दा असेल तर त्यावर शंकराचार्य तडजोड करायला का पुढे सरसावतात?

अयोध्या प्रश्नाच्या कायदेशीर आणि पुरातत्त्वशास्त्रीय गुंत्याच्या पलीकडे त्यात दोन मूलभूत प्रश्नांविषयीचा वाद अंतर्भूत होतो. एक प्रश्न आहे- भारतीय राष्ट्रवादाच्या स्वरूपाविषयीचा. रामजन्मभूमीचा वादपेटविणार्‍यांच्या मनात बहुढंगी राष्ट्रवादाविषयी तेढ आहे. त्यांना मुस्लिम समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका आहे. मुसलमानांना वगळणारा असा त्यांचा राष्ट्रवाद आहे. पण आता इथे ज्या मुद्याची चर्चा करायची आहे तो हा प्रश्न नव्हे, मग अयोध्या वादातला दुसरा प्रश्न काय आहे?

हा दुसरा प्रश्न असा आहे की, हिंदूंचे व मुसलमानांचे प्रतिनिधी कोण आहेत? शंकराचार्यांचा तोडगा आणि लॉ बोर्डाचा नकार या खेळात हा मूलभूत मुद्दा गुंतलेला आहे. गेल्या महिनाभरात हा प्रश्न कोणीच विचारला नाही की, शंकराचार्य सर्व हिंदूंचे प्रतिनिधी कसे काय बनले? समजा त्याचा तोडगा इतर हिंदूंना मान्य नसेल तर काय होईल? आणिशंकराचार्यांनी प्रस्ताव दिला तो मुस्लिम लॉ बोर्डाला. हे लॉ बोर्ड मुस्लिमांचे प्रतिनिधी आहे हे तरी कसे ठरले? हिंदू व मुस्लिम या दोन धार्मिक समूहांना त्यांच्या त्यांच्या धर्माच्या आधारे दोन अलग कप्प्यात बंद करून त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे राजकारण आज चालू असून त्या राजकारणासाठी शंकराचार्यांच्या प्रतिष्ठेचा खुबीने वापर करून घेण्यात आला आहे. संघ परिवार आणि भाजप यांनी चालविलेली भारतीय समाजाची भावनिक फाळणी पक्की होण्यास या घडामोडीतून हातभारा लागला आहे. काँग्रेस व इतर भाजपविरोधी पक्षांनी नेमक्या या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. हिंदूंमधील काही घटकांना शंकराचार्य हे धर्मगुरू म्हणून आदराचे असले तरीही आपण एक अवघड प्रश्न विचारलाच पाहिजे. तो असा की, शंकराचार्य हिंदूंचे प्रतिनिधी कसे झाले? आणि रामजन्मभूमीचा वाद हिंदू व मुसलमानांच्या अशा प्रतिनिधींवर सोपवून त्याची सलोख्याने सोडवणूक होईल का, याचाही विचार करावा लागेल.
१९८० च्या दशकात संघ परिवाराने रामजन्मभूमीचा मुद्दा राजकीय पटलावर आणून हिंदूंचे भावनिक राजकारण सुरू केले. आता त्या प्रश्नाचा निचरा व्हायचा असेल तर एकच उपाय आहे. तो म्हणजे हिंसेचेआणि द्वेषाचे राजकारण करणारे गट व पक्ष हे आपले प्रतिनिधी नाहीत हे सर्वसामान्य हिंदूंनी सातत्याने नोंदवले पाहिजे. त्याच्या जोडीनेच कर्मठ धर्मगुरू, शरियात दंग असलेले लॉ बोर्ड आणि मुस्लिम अस्मितेचे राजकारण करणार्‍या संघटना हे आपले प्रतिनिधी नाहीत, असे मुसलमान समाजाने नोंदवले पाहिजे.

कदाचित तसे करायला हिंदू व मुसलमान दोघेही तयार होतील. पण त्यांना आपले खोटे प्रतिनिधी हाकलून देण्याच्या कामी बळ द्यायला बिगर-भाजप पक्ष पुढे येतील का?


कांची कामकोटी शंकराचार्य related articles

अधर्माचा पर्दाफाश - http://www.loksatta.com/daily/20041127/lviv02.htm

शंकराचार्य आणि दुढ्ढाचार्य - http://www.loksatta.com/daily/20041127/lokkal.htm

कांची कामकोटीच्या शंकराचार्यांची अटक

चेन्नई : कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद सरस्वती यांना , कांची मठातील एका माजी कर्मचाऱ्याच्या खुनाबद्दल गुरुवारी मध्यरात्री आंध्र प्रदेशात मेहबूबनगरमध्ये नाट्यमयरीत्या अटककरण्यात आली. येथील एका कोर्टाने त्यांची 26 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी मदास हायकोर्टात सुनावणी होईल.

कांचीतीत शंकर मठात हिशेब व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेले शंकररामन यांचा तीन सप्टेंबरला खून झाला. मठातील अनेक आथिर्क गैरव्यवहार आपण जगापुढे आणू , अशी धमकी शंकररामनने शंकराचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्याची माहिती तपासात बाहेर आली. दविड मुन्नेत्र कळघमने या मुद्द्यावरून जयललिता सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे सरकार शंकराचार्यांना पाठीशी घालत आहे , कारण सरकार त्यांच्या हुकमानुसार चालते , असा दमुकचा आरोप होता.

शंकररामनने मठाला पाठवलेले पत्र , सुरुवातीच्या आरोपींच्या सेलफोन्सवरील संभाषण , मठाचे बँकखाते अशा सर्व अंगांनी तपास सुरू होता. दोन महिने असा चौकशी- तपासाचा घोळ चालवल्यावर अखेर गुरुवारी तामिळनाडू पोलिसांचे कमांडो पथक शंकराचार्यांना अटक करण्यासाठी खास विमानाने बंगलोरला रवाना झाले. पण शंकराचार्य तत्पूवीर्च मेहबूबनगरलारवाना झाले होते. पोलिसांनी तेथे मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांना अटक केली. त्यावेळी शंकराचार्य त्रिकाल पूजा करत होते.

त्यांना विमानाने येथे आणण्यात आले. प्रथम महानगर दंडाधिकारी जी. उत्तमराज यांनी त्यांनानेल्लोर येथील न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

हायकोर्टातही नकार

शंकराचार्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत त्यांना कोठडीत पाठवू नये , अशी विनंती त्यांचे वकील आय. सुब्रह्माण्यम यांनी मदास हायकोर्टात धाव घेऊन केली. शंकराचार्य यांना मधुमेहअसल्याने दररोज इन्शुलिन द्यावे लागते , असे त्यांनी सांगितले. मात्र हायकोर्टाचे न्या. सुब्रह्माण्यम यांनी विनंती फेटाळली. जामीनअर्जावर शनिवारी सुनावणी होईल. या काळात शंकराचार्यांना कोठडीत पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शंकराचार्यांवरील आरोप निराधार असून , त्यांना अक्षम व्यक्तींच्या साक्षींवरून अटक झाली आहे ,असा बचाव कांची मठाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांचे समाजातील स्थान आणि जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊन त्यांच्यावरील खटल्याचे वार्तांकन करू देऊ नये , ही मठाची विनंतीही हायकोर्टाने फेटाळली. अयोध्या प्रकरणात हिंदू महंत आणि मुस्लिम नेत्यांमध्ये मध्यस्थीकेल्याबद्दल शंकराचार्य गेले वर्षभर चचेर्त होते.

हिंदुत्ववाद्यांचा संताप

या घटनेविषयी भाजप तसेच विश्व हिंदु परिषद व आरएसएस या हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी संताप , तर दमुकने समाधान व्यक्त केले. तर , या अटकेचा तपशील आम्ही मागवला आहे , अशी सावध प्रतिक्रिया केंद सरकारने व्यक्त केली. हिंदूंच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला ,असा संघ परिवाराचा आणि शिवसेनेचा सूर होता. अटक करण्याइतका पुरेसा पुरावा होता काय ,असा सवाल या सर्वांनी केला आहे.

Thursday, April 21, 2011

बुद्धाचा मृत्यु

बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झाला, असं डॉ. र्‍हिस डेव्हिडस् व काही भारतीय अभ्यासकांचं मत आहे. दीघनिकाय या पाली ग्रंथाचा एक भाग असलेल्या महापरिनिब्बानसूत्तात ही कथा सांगितली आहे.

अजातशत्रूनं विज्ज राज्यावर स्वारी केली, त्यावेळी बुद्ध आपल्या शिष्यांसह तिथेच होता. पावसाळ्याचे दिवस होते, आणि विज्ज राज्यातल्याच एखाद्या विहारात पूर्ण पावसाळाभर राहण्याची बुद्धाची योजना होती. या चार महिन्यांत बुद्धाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्याला सतत तीव्र वेदना होत, असं महापरिनिब्बानसूत्तात म्हटलं आहे.

पावसाळा संपल्यानंतर बुद्ध आपल्या शिष्यांसह पावापुरीस आला. तिथे कुन्द नावाचा एक सोनार राहत होता. कुन्दानं बुद्धाची महती ऐकली होती. बुद्ध रोज आपल्या शिष्यांना संध्याकाळी उपदेश करत असे. कुन्द बुद्धाचं दर्शन घ्यायला संध्याकाळी गेला तेव्हा बुद्धाचं प्रवचन सुरू होतं. बुद्धाचं प्रवचन ऐकून कुन्द विलक्षण प्रभावित झाला, आणि तत्क्षणी त्यानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं. बुद्धानं आपल्या घरी जेवायला यावं, अशी साहजिकच त्याची इच्छा होती. त्यानं बुद्धाला तशी विनंती केली, आणि बुद्धानं कुन्दाचं आमंत्रण स्वीकारलं. अतिशय आनंदात कुन्द आपल्या घरी परतला आणि त्या रात्री जागून कुन्दानं बुद्ध व त्याच्या शिष्यांसाठी अनेक पदार्थ रांधले.

दुसर्‍या दिवशी कुन्द बुद्ध राहत होता त्या आमराईत गेला, व बुद्ध व त्याच्या शिष्यांना सन्मानपूर्वक आपल्या घरी घेऊन आला. बुद्धाला तो म्हणाला,'भगवान, मी आपल्यासाठी आज खास सूकरमद्दव तयार केलं आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा.' बुद्ध म्हणाला, 'सूकरमद्दव फक्त मला वाढ. इतर कोणाला नको.' कुन्दानं बुद्धाला सूकरमद्दव वाढलं, आणि इतरांना उरलेले पदार्थ वाढले. बुद्धानं जेमतेम काही घास खाल्ले असतील आणि त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्याच वेळी बुद्धानं कुन्दानं उरलेलं सूकरमद्दव एका खोल खड्ड्यात पुरून टाकायला सांगितलं. बुद्धानं आपलं जेवण पूर्ण केलं आणि काही मिनिटांतच बुद्धाला रक्ताचे जुलाब सुरू झाले. प्रचंड हुडहुडी भरली. आनंद, बुद्धाचा पट्टशिष्य, बुद्धाच्या आज्ञेनुसार त्याला कुशीनगरास घेऊन गेला. तिथेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झालं.

पाली भाषेतली ही कथा एकोणिसाव्या शतकात डॉ. र्‍हिस डेव्हिडस् यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्यावर पुन्हा एकदा प्रकाशात आली. तोपर्यंत चिनी व तिबेटी सूत्रग्रंथांचाच दाखला दिला जात असे. महापरिनिब्बानसूत्रात उल्लेखलेलासूकरमद्दव हा पदार्थ नेमका काय, याची चर्चा मग सुरू झाली. सूकरमद्दव या शब्दाचं भाषांतर डुकराचं मऊ मांस असं डॉ. डेव्हिडस् यांनी केलं आहे. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, असा निष्कर्ष काढला गेला. मात्र हाच निष्कर्ष इसवी सनाच्या पाचव्या शतकात बुद्धघोषानंसुद्धा काढला होता. सुमण्गल विलासिनी या आपल्या टीकाग्रंथात बुद्धघोषानं सूकरमद्दवाबद्दल लिहिलं होतं. डुकराचं मऊ मांस या अर्थाबरोबरच त्याने अन्य दोन अर्थही लावले होते. 'काही लोक म्हणतात की सूकरमद्दव म्हणजे गायीच्या मांसापासून तयार केलेला सुपासारखा पातळ पदार्थ. तर काही जणांच्या मते सूकरमद्दव हे एक औषध होतं. भगवान बुद्धांना दीर्घायुष्य मिळावं या हेतूने ते रसायनातील कृतीनुसार तयार केले असावे', असं बुद्धघोषानं लिहिलं आहे.

बुद्धयशस हा बुद्धघोषाचा समकालीन. हा काबुलचा राहणारा. इ. स. ४०२मध्ये तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला गेला. तिथं त्याने दीघनिकायचं चिनी भाषेत भाषांतर केलं. या ग्रंथाचं नाव दीर्घागम. या ग्रंथात बुद्धयशस सूकरमद्दव या शब्दाचंचंदनाच्या झाडाच्या कानांचं सूप असं भाषांतर करतो. चंदनाच्या झाडाचे कान म्हणजे अळंबी. चीनमध्ये आजही झाडावर उगवणार्‍या अळंबीला झाडाचे कान (木耳 - मूएर) म्हणतात.

पण अळंबीचा आणि सूकराचा, म्हणजे डुकराचा, काय संबंध? सूकर म्हणजे डुक्कर आणि मद्दव म्हणजे मऊ. सूकरमद्दवया शब्दाचा एक अर्थ डुकराने मऊ केलेले, म्हणजे लाथाडलेले, असाही होतो. हे वर्णन अळंबीला लागू पडतं. आयुर्वेदिय ग्रंथांमध्येही सूकरकन्द, सूकरपादिका, सूकरेष्ट अशी नावं भाज्यांना दिली आहेतच.

कुन्दानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं होतं. बुद्धाचा प्राणिहत्येला असलेला विरोध त्याला ठाऊक असणारच. त्यानं बुद्धासाठी मुद्दाम डुकराचं मांस शिजवावं, हे त्यामुळे पटत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धानं जेवण सुरू केल्यावर काही क्षणांतच त्याला वेदना सुरू झाल्या. अन्नातून होणार्‍या विषबाधेचे परिणाम इतक्या लवकर दिसत नाहीत. बुद्ध हा पावसाळ्यापासूनच आजारी होता. हाच आजार कुन्दाच्या घरी बळावला असणार. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, हा निष्कर्ष फारसा पटत नाही. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू नेमकं काय खाऊन झाला, यावर आजही चर्चा सुरू असतात.

http://www.maayboli.com/node/18736?page=1

Friday, April 1, 2011

श्रद्धा या विषयावर दाभोलकर आणि अभ्यंकर यांची जुगलबंदी

पुणे, दि. १८ (प्रतिनिधी) ः ‘श्रद्धा’ या संवेदनशील विषयावर ‘विद्यावाचस्पती’ शंकर अभ्यंकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष ‘विवेकसाथी’ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज जोरदार जुगलबंदी झाली. आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या या वक्त्यांनी विविध उदाहरणे आणि दाखले देत बुद्धिप्रामाण्यवाद आणि आध्यात्म या विषयांवर केलेल्या प्रभावी वक्तव्यामुळे श्रोते थक्क झाले. या विचारांच्या लढाईत हार मात्र कोणी मानली नाही.
‘साधना’ साप्ताहिक आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन या परिवर्तनवादी संस्थांनी एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या या परिसंवादासाठी मोठी गर्दी झाली होती. दोघांच्याही चाहत्यांनी त्या-त्या वेळी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना प्रोत्साहन दिले. आपला विषय मांडल्यानंतर दाभोलकर आणि अभ्यंकर यांनी एकमेकांचे मुद्दे खोडून काढले.
माणसाच्या संस्कृती, प्रगतीचा इतिहास म्हणजे श्रद्धा तपसाण्याचा इतिहास आहे. ४०० वर्षांपूर्वी गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून पृथ्वी सूयाार्भोवती फिरते, असा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याला पाखंडी ठरवून एकान्तवासाची शिक्षा धर्मानेच दिली होती, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’
श्रद्धा आणि अंधश्रद्धेत १०० टक्के फरक आहे. सात्त्विक श्रद्धा हरविल्याने देशापुढे सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला कारण बुद्धिप्रामाण्यवादीच आहेत, असे सांगून अभ्यंकर म्हणाले, ‘‘सगळ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. ज्ञानेश्वरांपासून विवेकानंदांपर्यंत ज्या अलौकिक गोष्टींचा अनुभव प्रज्ञावंतांना आला. सर्व संतांनी श्रद्धेविषयी लेखन केले आहे. अशा प्रज्ञावंतांचे शब्दप्रामाण्य हाच ईश्वर असल्याचा पुरावा. तमोगुण, सत्त्वगुण आणि राजस गुण असलेली श्रद्धा असते. तमोगुण कमी होऊन जोवर सत्त्वगुण जागृत होत नाहीत, तोवर जगात शांतता लाभणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा, अशी आपली व्याख्या आहे. श्रद्धा जनसमुदायाची पकड घेते, असे सांगून दाभोलकर यांनी श्रद्धेला तपासणीचा न्याय लावला पाहिजे, असा आग्रह केला आणि विश्वास, अंधविश्वास यांचे सविस्तर विवेचन केले. मनुवादी व्यवस्था स्वीकारणार्‍या आणि वर्णव्यवस्था लादणार्‍या परंपरेने माणूस जन्मजात उच्च किंवा नीच असू शकतो, असे मानले आहे. श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीची कवचकुंडले असतात. श्रद्धेला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, असे ते म्हणाले.
काही गोष्टी श्रद्धेने स्वीकाराव्या लागतात. भावना हा श्रद्धेचा विषय नाही. सानेगुरुजींनीही गायत्री मंत्राचा जप केल्यास पुनर्जन्म लाभतो, असे म्हटले आहे. विज्ञान आणि आध्यात्म ही एकच आहेत. अणूपासून विश्वाची निर्मिती हे विज्ञानाने आता मान्य केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू संस्कृतीने पूर्वीच सांगितलेले आहे. प्रत्येकाने आपली बुद्धी प्रमाण मानली, तर जगात गोंधळ उडाल्यावाचून राहणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
वैज्ञानिक भाव बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव तपासणे. माझा विवेक हा बुद्धीचा निष्कर्ष आहे; तो देवाचा आदेश नाही, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘भावना माणसाची मालक आणि विचार नोकर असतात. कार्यकारणभाव हे माणसाचे मोठे वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधी परमेश्वर हेच सत्य, असे मानत. एका अनुभवाने ते सत्य हाच परमेश्वर म्हणू लागले.’’

From -

Friday, February 25, 2011

महात्मा फुले

१.
गेल्या कित्येक पिढ्यांपासून ज्यांना मानूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला गेला होता त्यांना समान वागणूक मिळावी म्हणून लढणारा महात्मा कसा असू शकतो?
ज्या पानवठ्यावर जनावरांना पाणी प्यायची परवाणगी होती तेथे काही लोकांना पाणी पिण्याची बंदी होती, अशी बंदी मोडून घरचा हौद या लोकांसाठी खुला करणारा महात्मा कसा असू शकतो?
समानता ही केवळ लिहीण्याची - बोलण्याची बाब नाही तर ती कृतीत उतरली पाहिजे असं बोलून आपल्या पत्नीला लिहायला शिकवले, व तीच्या माध्यमातून पहिली भारतीय मुलींची शाळा काढली. शिक्षणाची गंगा जनसामाण्यांपर्यंत पोहोचवणारा , महात्मा कसा असू शकतो?
शेती करतांना नवनवीन तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती फायद्याची होते हे प्रत्यक्ष शेती करून (फक्त एवढ्यासाठी शेती केली) पटवून देणारा , महात्मा कसा असू शकतो?
त्याकाळी कमी वयात वैधव्य आल्यावर अड्यानिड्या वयात कुणी त्या विधवेचा गैर फायदा घेतल्यास त्यामुळे आलेल्या गर्भारपण आणि त्यापुढील समाजाने अनौरस मानलेल्या संततींना जगण्याचा हक्क मिळावा म्हणून झटनारा, महात्मा कसा असू शकतो?
समाजसेवा करतांना जातीच्या बंधनात न अडकता काम करणारा, आणि समाजसेवा करीत असतांना आपल्या चरितार्थासाठी वेगळा व्यवसाय करणारा व्यक्ती, महात्मा कसा असू शकतो?
महाराष्ट्राच्या लाडक्या शिवाजी महाराजांची समाधी शोधून त्यावर सर्वप्रथम फुले वाहणारा आणि सर्वप्रथम शिवजयंती उत्सव साजरा करणारा, शिवाजींवर पवाडा करणारा मानुस, महात्मा कसा असू शकतो?
- नीलकांत

२.

डावपेचात्मक ब्रिटिशप्रेम का न मानावे?


ब्रिटिशांकडून आपले काम फत्ते करून घेण्याचे दुसरे एक उदाहरण आठवते.
सावरकरांनी भारतीय तरुणांना ब्रिटिश फौजेत रक्त सांडण्यासाठी पाठवले, ते अत्र्यांना सुरुवातीला देशद्रोही वाटले. (त्यावेळी सावरकरांनी ब्रिटिशांच्या बाजूने काही लिखाण केले होते.) पण हा डावपेच होता, जेणेकरून भारतीय तरुण प्रशिक्षित व्हावेत. ब्रिटिश सोडून गेल्यावर हा डावपेच होता हे सर्वांना कळले, आणि अत्र्यांनीही त्याचे महत्त्व मानले.
फुल्यांनी एक पूर्वापारची प्रथा बदलण्यासाठी ब्रिटिशांची मदत घेतली, आणि ब्रिटिशांचे माफक गुणगान केले, म्हणा. ब्रिटिश जाईपर्यंत ते हयात नव्हते. त्यामुळे त्यांना ब्रिटिशांचे ते गुणगान मागे घेणे कसे शक्य होणार?
तरी हा पाहुण्याकडून साप मारून घेण्याचा हा फुल्यांचा डावपेच मानावा.

३. महात्मा फुल्यांनी केलेले लेखन हे तार्किक मांडणीच्या उद्देशाने केले असेल वा नसेल पण ज्या समाजाच्या उद्धारासाठी कार्य करायचे आहे त्या समाजाला समजेल, पटेल व आवडेल अशा भाषेत ते केले होते. हिंदूंचे देव रुढी निर्माण करीत नाहीत हे म्हणणे योग्य असले तरी हिंदूंच्या देवांच्या नावाने रुढी निर्माण करणार्‍यांनी स्वतःची पोटे जाळण्यासाठी देवतांचा वापर केला होता हे सत्य आहे. वरवर पाहता निरर्थक वाटणार्‍या मंदिरप्रवेशासाठी कित्येक उपोषणे झाली आहेत याचा इतिहास कुठेही सापडेल. मंदिरे व दैवते यांचे समाजातील महत्त्व आणि तत्कालीन समाजात (व आजकालही) असलेला देवभोळेपणा लक्षात घेता, मुळावर घाव घालण्याच्या उद्देशाने महात्मा फुल्यांनी देवतांबाबत केलेले लेखन योग्यच होते असे माझे मत आहे. समाजामध्ये असलेली अंधश्रद्धा किंवा तथाकथित देवतांबाबत असलेला आदर उखडून टाकण्यासाठी असे जालीम इलाज करणे आवश्यक असते. असे इलाज करण्याचे धैर्य असणारे फुले प्रत्येक पिढीत जन्माला येत नाहीत. किंबहुना फुलेच नव्हे तर संत तुकाराम, ई.व्ही.रामस्वामी पेरियार यांसारख्या क्रांतीकारक समाजसुधारकांनीही सर्वांना समजेल अशीच परखड भाषा वापरण्याची पद्धत वापरली होती.
तुकारामांच्या अभंगांमध्ये वापरलेले शब्दही हिंसक किंवा अश्लील वाटू शकतात.
संतासी देखोनी होय पाठमोरा । दासीचिया पोरा चुंबन देतो ॥ध्रु.॥
संतासी देखोनि करितो टवाळ्या । भावें धुतो चोळ्या दासीचिया ॥२॥
तुका ह्मणे त्याच्या तोंडावरी थुंका । जातो यमलोका भोगावया ॥३॥
या अभंगात तुकारामांनी तोंडावरी थुंका असे सांगितले आहे म्हणजे ती 'शाब्दिक व शारीरिक हिंसा' झाली. शिवाय रुढार्थाने ते 'अनहायजिनिकही' आहे. पण ज्या काळात ही रचना केली गेली तिचा संदर्भ ध्यानात घेणे आवश्यक आहे.
अश्लीलता किंवा हिंसा ही केवळ शब्दात असते हा समज चुकीचा आहे. संस्कृतप्रचुर गोड शब्दांमध्ये गुंडाळलेली हिंसा दिसत नसली तरी ती तितकीच दाहक असते.
आपला,
(सविस्तर) आजानुकर्ण
एतद्देशीय पेशवे गेल्यानंतर इंग्रज राज्यकर्ते आले तेव्हा 'पुन्हा पेशवाई नको' असा समाजातील खूप मोठ्या वर्गाने सुटकेचा निश्वास सोडला होता ही अवांतर माहिती द्यावीशी वाटते.
-- आजानुकर्ण

============
महात्मा फुले यांच्याविषयी जेव्हा जेव्हा विषय चर्चेला येतो तेव्हा तेव्हा त्यांचे हिंदू धर्माबद्दलचे, देवतांबद्दलचे लिखान, इंग्रज सरकारविषयीचा दृष्टीकोण हे मुद्देही चर्चेला येतातच! नव्हे, ते यायलाच हवेत आणी सगळ्याच मुद्यांबाबत साधक-बाधक चर्चा व्हायला हवी. मला खात्री आहे की चर्चेअंती या थोर समाजसेवकाबद्दलचे यामुळे होणारे गैरसमज नक्कीच दूर होण्यासाठी मदत होईल.

मुळातच त्यांचे विचार वा लिखान समजावून घेताना त्याला आपण सध्याच्या परिस्थितीतील मोजपट्या लावणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल! उदाहरणच द्यायचे म्हणले तर सध्याच्या काळात दोन लग्ने करणे हे असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. मात्र पुर्वी हा रिवाज समाजमान्य आणी प्रचलीत होता. मग आजच्या या बदलेल्या सामाजीक मुल्यावरुन पुर्वी एकापेक्षा अधीक लग्ने केलेल्या थोर इतिहास पुरुषांना आपण
असभ्य ठरवणार आहोत का? नक्कीच नाही! कारण तात्कालीन रिवाजाप्रमाणे (परिस्थितीप्रमाणे) त्यात काही वावगे नव्हते. अगदी हाच विचार फुलेंबाबतही प्रत्येकाने केला तर बर्‍याचशा गोष्टी चटकन स्वच्छ होतील. 
ब्रिटीश राजवट आणी म. फुले:
पहिल्यांदा त्यांच्या ब्रिटीश राजवटीविषयीबद्दल असणार्‍या आपुलकीविषयी बोलुयात.... वर उमेशच्या पोस्टप्रमाणे ब्रिटीशांनी रेल्वे, टपाल ई सेवा भारतात सुरु केल्या हे नेहमी सांगीतले जाते पण माझ्या मते तरी त्यांनी या सुविधा भारतीय लोकांसाठी नव्हे तर मुख्यत्वे त्यांचे राज्य सुरळीत चालावे म्हणून प्रशासकीय सुलभेतेसाठी केलेल्या होत्या. त्याबद्दल आपण अनुकंपा बाळगणे तेवढे योग्य होणार नाही. मात्र राजाराय मोहन रॉय सारख्या समाजसुधारकाला पाठींबा देऊन, सामाजीक विरोध डावलून कायद्याने सतीची प्रथा बंद करणे वगैरे सारख्या सामाजीक सुधारणा म्हणता येतील अशा ब्रिटीशांनी अमलात आणलेल्या गोष्टीही आपण नाकारु शकणार नाही हेही सत्य आहे.

तेव्हापर्यंत भारतीय समाजव्यवस्था ही धार्मीक पायावर उभी होती तर इंग्रज सरकारने धर्मविरहीत लिखीत कायदा आमलात आणला होता. हिंदू धर्मातील जातीभेद इतका टोकाला पोहचला होता की काही जातींना किमान माणुस असल्याची वागणूकही सवर्ण समाजाने नाकारली होती. मात्र ब्रिटीश कायद्यामध्ये या जतीभेदाला स्थान नव्हते. ज्योतीबांच्या समाजीक कार्याला ब्रिटीशांचा पाठींबा होता तर याउलट जातविरहीत समाजरचनेसाठी तळमळीने काम करणार्‍या फुलेंना सवर्ण व्यवस्थेकडून (पर्यायने भारतीय समाजव्यवस्थेकडून) प्रचंड विरोध पत्करावा लागत होता. अशा वेळी फुलेंचे मत ब्रिटीश राजवटीविषयी अनुकुल बनले असण्याची शक्यता न्याय्य ठरत नाही का?

शिवाय फुलेंचे जिवीतकार्य १८२७ ते १८९० पर्यंतचे आहे. त्या कालखंडात ब्रिटीशांविरुध्द सामाजीक लढा, संघर्ष अशा गोष्टी घडलेल्या नाहीत. म्हणजे अशा स्वातंत्र्य संघर्षाला ज्योतीरावांनी विरोध करुन ब्रिटीशांबद्दल अनुकुल मत दिले आहे असेही नव्हे!
हिंदू धर्म आणी म. फुले:
फुलेंना अस्पृश्यता निवारण, मुलींचे शिक्षण अथवा काही सामाजीक अनिष्ट प्रथा दूर करताना कर्मठ आणी सनातनी लोकांचा धर्माच्या नावाखाली झालेला विरोध सर्वश्रूत आहे! मुळातच सवर्ण व्यवस्थेने केवळ आपले वर्चस्व रहावे म्हणून धर्माच्या नावाखाली कनिष्ठ जातींना वर्षानुवर्षे दिलेली अमानवी वागणूक ही अन्यायकारक होती. आपले दुर्दैव हे की हे सगळे हिंदू धर्माच्या नावाखाली चालवले गेले. अशा वेळी धर्मातील भेद मान्य करणार्‍या प्रथा बदलण्यासाठी ठाम नकार देणार्‍या वा त्याला विरोध करणार्‍या व्यवस्थेमुळे हिंदू धर्माबद्दलचे मत कलुषीत होणे नक्कीच शक्य आहे. (पुढील काळात त्याची परिणीती करोडो हिंदूंनी धर्माचा त्याग करुन बौध्द धर्माचा स्विकार करण्यात झाली हे सत्य सगळ्यांनी अनुभवले. पण तो येथे चर्चेचा विषय नाही).

हिंदू धर्मातील या अनिष्ट प्रथांवर टिका लिहीणे किंवा हा भेद देवालाही मान्य आहे अशा पसरविल्या गेलेल्या भ्रामक समजुतीवर आघात करताना देवतांबद्दल लिहीले जाणे आपणही मान्य करायला हवे. हा हिंदू धर्मावर वा देवतांवर हल्ला नसून भेदाभेद मान्य करणार्‍या, त्याचे समर्थन करणार्‍या प्रथांवर, घटकांवर केलेला हल्ला आहे हा भेद आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करायला हवा! सध्याचे हिंदू धर्माचे स्वरुप हे खुप बदलेले, सुधारणावादी आहे म्हणून आपल्याला आपल्या धर्माचा अभिमान आहे. मात्र पुर्वी अशी परिस्थिती नव्हती हे खेदाने नमूद करावे लागते आहे. त्यामुळे तात्कालीन टिकेबद्दल आकस न ठेवता ते आघात आपण सध्या सकारात्मक दृष्टीने स्विकारणेच आपल्या धर्मासाठी, समाजासाठी हिताचे आहे. म. फुलेंची टिकाही आपण अशीच स्विकारावी असे माझे मत आहे.
भारतात पुर्वी मुस्लीम धर्माचा प्रसार तलवारीच्या जोरावर जसा झाला तसाच तो सुफी संतांच्या 'मुस्लीम धर्म हा जातीभेदविरहीत असून सर्वांना समान मानणारा आहे' या शिकवणुकीमुळेही झाला हे सत्य आपण जेवढे लवकर स्विकारु तेवढे आपल्यासाठी चांगले असेल. जात न मानणारा मुस्लीम धर्म अनेक कनिष्ठ जातीतील लोकांना जवळचा वाटला हे खरे आहे! फुलेंचे 'शिवाजीने मुस्लिम राज्य हाणून पाडले आणि नवीन हिंदू राज्य स्थापन केले वास्तविक पाहता याची काही गरज नव्हती' हे विधान या अनुषंगाने आले असावे असे मान्य करण्यास वाव आहे. त्यांनी शिवरायांबद्दल केलेल्या इतर विधानांची कल्पना नाही आणी ते पुर्ण संदर्भासह वाचल्यावर त्याव्र लिहीणे योग्य ठरेल. मात्र एका सदस्याने आधीच त्यांचा शिवरायांबद्दलचा पोवाडा देऊन फुलेंचे शिवरायांबद्दलचे विचार कलुषीत नव्हते याचा दाखला दिलेला आहे.

सारांश.. आधीच म्हणल्याप्रमाणे फुलेंच्या विचारांकडे त्या काळच्या परिस्थितीचा विचार करुन पहायला हवे. अन्यथा तो या थोर समाजसुधारकावर अन्याय ठरेल!
 - अवधूत खरमाळे