Friday, March 9, 2012

गांधी, कॉंग्रेस आणि गांधीवाद

गांधीवाद हा समाजवाद, भांडवलवाद ह्यांसारखा वाद नाहीये. तो हिंदु धर्माचं खरं इंटरप्रेटेशन आहे. त्याच्या अनुषंगांने समाजात लोकांनी कसं जगावं.. कसं वागावं..समाजव्यवस्था कशी असावी, अर्थव्यवस्था कशी असावी..राज्यव्यवस्था कशी असावी ह्याबद्दलची गांधींची मतं आहेत आणि ती त्यांनी त्यांच्या अनुभवातुन, निरिक्षणातुन बनवली होती...त्यांनी त्याचा प्रचार केला.... लोकांनी त्या मतांचा आदर केला [follow नाही केलीत].

गांधींमागे लोकं का गेली ह्याचे उत्तर गांधीवादात नाहीये...तो फ़ारसा लोकांना कळला नाहीच कधी. पण लोकांना त्या व्यक्तीबद्दल खात्री होती. तो जे म्हणतोय तसं केल्याने आपला उद्धार होईल हे त्यांना जाणवत होतं. म्हणुन त्यांना प्रत्येक राजकिय चळवळीत प्रचंड जनाधार मिळाला.

गांधींच्या जनाधाराचा, संघटन कौशल्याचा फ़ायदा कॉंग्रेसच्या नेत्यांनी पुरेपुर उचलला...एका जिल्ह्याचे नेते व्हायची लायकी नसलेले लोकं प्रमुख नेते म्हणुन पुढे आले. सत्ताधीश झालेत. लोकांपुढे फ़क्त गांधींची जपमाळ ओढुन आपणच खरे गांधीवादी म्हणुन त्या लोकांनी मिरवले. आणि लोकांनाही गांधीवादातला ’ग’ ही माहित नसल्याने ते कॉंग्रेसच्या मागे फ़रफ़टत गेले.

एकतर गांधीवाद माहित नाही...वरुन कम्युनिस्ट आणि फ़ॅसिस्ट संघटनांनी गेले ८० वर्ष गांधींबद्दल अपप्रचार सुरु ठेवलाय त्याचाही थोडा परिणाम झालाच आणि गांधी हळुहळु बदनाम होत गेले. पण एक ’लगे रहो मुन्नाभाई" आला आणि वातावरण पुन्हा बदलले. गांधीबद्दलचे प्रेम भारतीयांच्या मनात इतके खोलवर रुजलंय की त्यांची बदनामी सिरिअसली घेणेही भारतीय टाळतो. गांधी हा साधारण माणुस होता...कोणी अद्वितीय विचारवंत, विद्वान नव्हता हे भारतीयांना माहिती आहे. पण जसा आपल्या घरातला वृद्ध माणसाबद्दल त्यांच्या कार्याबद्दल आपण आदर बागळुन असतो, तसाच आदर भारतीय गांधींबद्दल बाळगुन आहेत.

-----------

धीजींची ताकद हीच की ते भारतीयांचे पाणी पुरेपूर जोखून होते. क्रांती, स्वातंत्र्य वगैरे नवविचार भारतीयांना कितपत आणि कुठवर झेपतील याचा अंदाज गांधीजींना सर्वात चांगला होता. त्यांचा पंचा हासुद्धा (तत्कालीन) भारतीयांच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नांचाच भाग समजला पाहिजे. नेता म्हणजे कुणीतरी भारदस्त, तेजस्वी, परग्रहावरून आल्यासारखा माणूस या समजाला गांधींनी छेद दिला.
त्यांचे स्वातंत्र्यप्राप्तीचे उपायही साधे सोपे असत. "तुम्हाला दांडीयात्रेत यायचे असेल तर माझ्यासोबत चाला. इंग्रजांच्या लाठ्या खा. ते जमत नसल्यास घरी चरखा चालवून देशाला बळ द्या. तेसुद्धा जमत नसेल तर परमेश्वराकडे आमच्या आंदोलनाला यश यावे म्हणून प्रार्थना करा." देशातल्या लहानातल्या लहान माणसाला त्यांनी काही ना काही कार्यक्रम दिला होता. आपल्या अनुयायांना इतके समजून घेणारा नेता दुसरा नसेल.
गांधीजी साधे होते, ते या अर्थाने. 
- ज्ञानेश पाटील

--------

स्वातंत्र्य आपोआप कुठुन मिळेल? इतक्या चळवळी, इतके सत्याग्रह स्वातंत्र्य मागण्यासाठी नव्हते? १९४२ ला दिलेला चलेजावचा नारा देण्याइतके आत्मिक बल कुठुन आले?

स्वातंत्र्याला आपण लायक आहोत याची पुरेपुर खात्री पटल्याशिवाय १९३० साली कॉंग्रेसने दिलेला पुर्ण स्वातंत्र्याचा नारा गांधींना विश्वासात न घेताच आला? १९३१ साली गोलमेज परिषदेत स्वातंत्र्य मागायला गांधी उगाच गेले होते का?
१९२२ च्या चौरीचौरा प्रकरणामुळे चळवळ मागे घेणाऱ्या गांधींना पुढच्या सात-आठ वर्षात खात्री पटली की भारतीय स्वातंत्र्याला लायक आहेत असं ह्या मधल्या काळात कुठले लोकपरिवर्तन झाले होते?

’भारतीय लोकांना स्वातंत्र्याला लायक बनविणे’ असं गांधींना वाटणं म्हणजे आपण स्वत: कोणीतरी महान आहोत असा विचार त्यांच्या मनात असला पाहिजे. स्वत:ला महान समजण्याइतके गांधी लहान अजिबात नव्हते.

गांधी जे वैयक्तिक आयुष्य जगले त्याचे अनुकरण किती कॉंग्रेसी नेत्यांनीही केलं असेल याची एकदा यादी करुन बघावी. लोकांनी तर सोडाच बहुतांश कॉंग्रेसीनीही गांधीवाद कधीही आचरला नाही.

कितीही कटु असले तरी सत्य हेच आहे की गांधींच महत्व हे लोकांना राजकिय चळ्वळीत ओढुन आणण्याइतकंच होतं. गांधीवाद भारतीयांच्या पचनी कधी पडलाच नाही, पण त्याबद्दल आदर मात्र नक्कीच होता, कारण गांधीचे विचार हे पारंपारीक भारतीय संस्कारांपेक्षा वेगळे नव्हतेच कधी. फ़क्त त्याचा उपयोग राजकिय-सामाजिक स्तरावर करण्यात लोकं कचरत होती. एकदा संघटन मिळाले तेव्हा लोकं आपोआप बाहेर पडलीत.

गांधींचं मुख्य कार्य हे संघटन बनवुन लोकांना सामर्थ्य देण्यात होतं. पण याचा अर्थ असा नाही की स्वातंत्र्यचळवळ की गांधीवादाने लढली गेली किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत गांधीवादी मार्गाने गेला.

गांधी हा एक महान तत्ववेत्ता आहे असं कधी त्यांच्या अनुयायांनीही मानलेलं नाही. जेव्हढं पटतं तेव्हढंच घेतलं. पण पटत नाही म्हणुन त्यांचा तिरस्कार कोणीही केला नाही. उलट त्यांच्या मतांचा आदरच लोकांनी केला. गांधी हा धर्माचा सच्चा ’फ़ॉलोवर’ असाच त्याचा अर्थ होता


- शैलेंद्र पाटील

-------
 

No comments:

Post a Comment