Wednesday, March 7, 2012

घरगुती सावरकर

सावरकरांच्या संघर्षातील कालखंडाचा लेखाजोखा बराचसा त्यांनी लिहून ठेवला आहे. त्यांच्या विचारांचे मंथनही बरेच झाले आहे. त्यांच्यासह बर्‍याच जणांनी ते केले आहे. परंतु, संघर्षाच्या सुरवातीचा कालखंड ओलांडल्यानंतरचे सावरकर कसे होते, या विषयी फारसे कधी वाचनात आले नव्हते. नुकतंच रवींद्र पिंगेच्या 'देवाघरचा पाऊस' या ललित पुस्तकात सावरकरांचे चिरंजीव विश्वासरावांची मुलाखतवजा लेख वाचायला मिळाला. त्यातून 'घरातले' सावरकर कसे होते, ते कळायला मदत झाली. त्यातल्या माहितीचा हा कोलाज...
.
सावरकरांचा कर्मकाडांवर विश्वास नव्हता. पण ते जानवे नेहमी घालायचे. कारण विचारल्यावर सांगायचे, 'जानवे ही चावीचा जुडगा अडकविण्याची सोय आहे.' शिवाय मजबूत असल्याने तुटत नाही. त्यामुळे गळ्यात घालायला अन्य कोणताही दोरा त्यांना चालत नसे. अर्थात, श्रावणी करून घेऊन ते जानवे घालत नसत. कुठलेही मंत्रोच्चार ते जानवे घालताना करत नसत.

रूढार्थाने देवावर विश्वास नसला तरी सावरकर कोणत्या तरी अज्ञात शक्तीला मात्र मानत. कोणतेही कर्मकांड करत नसले तरी रोज अंघोळ झाल्यावर दहा मिनिटे स्वस्थ बसून कुलदेवता 'अष्टभूजादेवीचे' स्तोत्र ते म्हणत. त्यांना इतरही बरीच स्तोत्रे येत होती.

कर्मकांडांना विरोध असला तरी समुच्च हिंदूंना एक करण्यासाठी त्यांना त्याचाही आधार घ्यायची गरज पडत होती. म्हणून बाटवलेल्यांना पुन्हा हिंदू केल्यानंतर केल्या जाणार्‍या धार्मिक कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित रहायचे.

सत्यनारायण पूजा वगैरे भानगडी त्यांच्या घरात कधी होत नव्हत्या. इतकेच काय देवपूजाही होत नसायची.
रत्नागिरीला अस्पृश्योद्धाराचे काम त्यांनी सुरू केले, त्याला उच्चवर्णियांचा पाठिंबा फारसा नव्हता. इतकेच काय ते ज्या नाना पटवर्धनांच्या घरात रहात असत त्यांचाही त्याला पाठिंबा नव्हता. पण म्हणून त्यांनी सावरकरांना घरातून बाहेर काढले नाही.

सावरकरांनी कधीच आपल्या मुला बाळांना किंवा कुटुंबियांना राजकीय कार्यात आपले 'वारस' म्हणून पुढे आणले नाही. कोणत्याही सभेला पत्नीला वा मुलांना नेले नाही. आपल्यातील अत्त्युच्च गुणांचा वारसा जाणीवपूर्वक वाहून न्यावा यासाठीही प्रयत्न केले नाहीत.

विश्वासरावांच्या मुलीचे असीलता म्हणजे खड.ग हे नावही त्यांनीच ठेवलेले.
सावरकरांचे आणि संघाचे 'तात्विक' आणि (सैद्धांतिकही?) मतभेद असले तरी सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. नारायणराव सावरकर मात्र संघाचे स्वयंसेवक होते. सावरकरांनी त्यांचे निर्णय स्वातंत्र्य अबाधित राखले होते.
त्यांच्या घरी कायम लोकांचा राबता असे. सकाळपासून माणसे घरी येत असल्याने आवरासावरीला उशिर होई. त्यांची अंघोळही बरीच उशिरा होई. सहाजिकच जेवणासही उशिर होत असे. परंतु, घरच्यांना वेळीच जेऊन घेण्याची त्यांची ताकीद होती. माईने आपल्यासाठी जेवायला थांबू नये असे ते स्पष्ट सांगत.

सुरवातीच्या काळात सावरकर कुटुंबाला आर्थिक अडचणींना खूप तोंड द्यावे लागले. पण ब्रिटिश सरकारकडून त्यांना साठ रूपये पेन्शन यायची. त्यात घरखर्च चालायचा. या काळात ते मुंबईच्या दिनबंधूचे संपादन विनावेतन करायचे. स्वातंत्र्योत्तर काळात त्यांना सरकारी पेन्शन मिळू लागली. त्यात कुटुंब खर्च भागू लागला.
पुढे मुंबईत आल्यानंतर त्यांनी राजकीय कार्य हिंदूमहासभेच्या माध्यमातून जोमाने सुरू केल्यानंतर त्यांना मदतनिधीच्या रूपात पाच-दहा हजाराच्या थैल्या मिळू लागल्या. त्यातून बरेच आर्थिक प्रश्न सुटले. एकदा लाखाची थैली मिळाली. त्यातून तर जवळपास सर्वच आर्थिक प्रश्न सुटले.

सुरवातीला खारला राहिल्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कात सावरकर सदन बांधले. त्यात लाकडाचा, विटांचा वापर केला. गांधीहत्येनंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली, तेव्हा सावकर सदनही त्याला अपवाद नव्हते. पण मजबूत घरामुळे नुकसान झाले नाही. घर बांधताना ते पक्के असावे यामागचा त्यांचा हेतू कोणत्याही हल्ल्याला तोंड देणारे असावे हाच होता.
- भोचक

-------------

चाव्या अडकवण्यासाठी जानवेच कशासाठी पाहिजे? हल्ली ओळखपत्रे किंवा कार्यालयीन इमारतींत प्रवेशाकरिता लागणार्‍या चुंबकीय पट्टिका गळ्यात टांगण्याकरिता वापरतात तसले पट्टे, किंवा प्रवासात पारपत्र हरवू नये म्हणून गळ्यात लटकवण्याकरिता वापरतात तसल्या बटवावजा पिशव्या चालू शकणार नाहीत काय?
फार कशाला, असले पट्टे किंवा बटवेवजा पिशव्या त्या काळात सर्रास उपलब्ध नव्हत्या असे जरी मानले, तरी त्याजागी एखादी सुतळी किंवा दुमडून दुहेरी किंवा तिहेरी केलेला आणि पीळ मारलेला पुडी बांधण्याच्या सुताचा धागा चालू शकला असता असे वाटते. सावरकरांच्या काळात सुतळ्या आणि पुडी बांधण्याचे धागे निश्चित उपलब्ध असावेत. आणि तेही चांगले मजबूत असतात.
जानवे जेव्हा सर्रास वापरले जात असे, त्या काळात तसे ते बांधण्यामागे 'किल्ल्या अडकवण्यासाठी सोय' हा प्राथमिक उद्देश खचितच नव्हता. अनायासे धार्मिक कारणांसाठी जानवे बांधणे हे अपरिहार्यच आहे, तेव्हा किल्ल्या बांधण्यासाठी सोयिस्कर म्हणून तसाही उपयोग केला तर कोठे बिघडले, अशी त्यामागची सर्वसाधारण मनोभूमिका असे. मात्र 'चाव्या बांधण्यासाठी सोय' म्हणून जानवे टिकवावे, हे तर्कविसंगत वाटते.
अर्थात एखाद्याने जानवे वापरावे किंवा न वापरावे, किंवा वापरल्यास कोणत्या कारणाकरिता वापरावे, हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याबाबत काहीच म्हणणे नाही. पण 'चाव्या अडकवण्यासाठी जानव्याचा उपयोग' करण्यात किंवा स्वतःच्या जानव्याच्या वापराचे तसे समर्थन करण्यात 'विशेष थोर' असे काही आहे असे वाटत नाही. क्षमस्व.
सांगण्याचा उद्देश, सावरकरांचा आदर करण्याकरिता, त्यांची थोरवी मानण्याकरिता इतर अनेक गोष्टी सापडू शकतील, परंतु ही त्यातली एक आहे असे वाटत नाही. 'सावरकरांच्या घरगुती आयुष्यातील एक गोष्ट' इतपतच महत्त्व या बाबीला आहे, आणि तेवढेच महत्त्व या बाबीला द्यावे, त्याहून अधिक महत्त्व देण्याची गरज नाही, असेही वाटते. त्या दृष्टीने या लेखातील या बाबीचा उल्लेख ठीकच आहे, परंतु 'हा विचार पचवू शकणारे हिंदुत्ववादी जेव्हा पुढे येतील तो सुदिन' या विधानातून ही बाब अतिशय महत्त्वाची आहे, किंवा असा विचार करण्यात सावरकरांची काही विशेष थोरवी आहे, असे जे काही अध्याहृत अभिप्रेत होते, ते अस्थानी आहे असे वाटते. विशेषतः सावरकरांची थोरवी दाखवून देण्यासारख्या इतर अनेक बाबी असताना या क्षुल्लक आणि पूर्णपणे अवांतर बाबीस अवास्तव महत्त्व देऊन त्यातून सावरकरांच्या थोरवीबद्दल दावा करणे म्हणजे सावरकरांची थोरवी खरोखरच ज्या बाबींत आहे त्यांचे महत्त्व कमी करण्यासारखे वाटते. पुन्हा क्षमस्व.
याशिवाय, यज्ञोपवीतवादाचा (किंवा यज्ञोपवीतवाद्यांचा किंवा तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजांचा) आणि हिंदुत्ववादाचा (किंवा हिंदुत्ववाद्यांचा - आजच्या राजकीय अर्थाने) जो अन्योन्यसंबंध या विधानातून अभिप्रेत होत आहे, त्या अनोन्यसंबंधाबद्दल जरासा साशंक आहे. (स्पष्टच सांगायचे झाले तर सर्व हिंदुत्ववादी म्हणजे विशेषत: सदाशिव-नारायण-शनवारातली भटें नव्हेत, आणि उलटपक्षी सर्व सदाशिव-नारायण-शनवारातली भटें म्हणजे हिंदुत्ववादीही नव्हेत.)
त्याहूनही अधिक बोलायचे तर, आजच्या जमान्यात अगदी तथाकथित यज्ञोपवीतवादी समाजातील हिंदुत्ववाद्यांपैकीसुद्धा सर्वजण कटाक्षाने जानवे वापरत असावेत याबद्दल साशंक आहे. या संदर्भात काही खात्रीलायक विदा उपलब्ध असल्यास जरूर मांडावा. (जे वापरत नाहीत त्यांकरिता जानव्याच्या अशा वापरासंबंधी विचार पचण्या-न पचण्याचा प्रश्न येऊ नये. आणि जे वापरतात, त्यांनासुद्धा, अगदी पूर्वीच्या काळातील कर्मठांकडूनसुद्धा जानव्याचा असा वापर सामान्यतः प्रचलित असल्याने, अपचनाचे काही कारण दिसत नाही.)
थोडक्यात, सावरकरांच्या जानव्याविषयीच्या विचारांचा (बादरायण?) संबंध आजच्या किंवा भविष्यातल्या ("जेव्हा पुढे येतील") हिंदुत्ववाद्यांशी जोडणे हे एका बिनमहत्त्वाच्या बाबीला (नॉन-इश्यू किंवा नॉन-ईव्हेंट) विनाकारण अवास्तव महत्त्व देण्यासारखे आणि ओढूनताणून वाटले. (आणखी एकदा क्षमस्व.)
- पंडित गागाभट्ट.

------------

(१) ब्रिटिश पेन्शन >> सावरकरांना त्यांनी ब्रिटिश साम्राज्याविरूध्द पुकारलेल्या सशस्त्र हालचालीबाबत अटक होऊन त्यांना विविध कलमाखाली एकूण ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली व त्यांची रवानगी अंदमान जेलमध्ये झाली होती. तेथील दहा वर्षाच्या सक्तमजुरीच्या काळात त्यांचे अतोनात शारिरीक आणि मानसिक हाल झाले. प्रकृती इतकी ढासळली होती की त्या वातावरणात त्यांना तेथे ठेवणे जेल अधिकार्‍यांना ठीक वाटले नाही म्हणून त्यांची भारतातील तुरुंगात रवानगी करण्यात आली. इथे ४ वर्षे विविध तुरुंगात काढल्यानंतर शिक्षेची उरलेली वर्षे त्यांनी "नजरकैदेत" काढावीत असा निर्णय राज्यकर्त्यांनी घेतला व त्यांना रत्नागिरी येथील त्या छोट्या बंगल्यात आणले गेले. साल होते १९२९. सावरकर हे अजूनही ब्रिटिशांचे कैदी होते त्यामुळे त्यांना रत्नागिरी ह्द्दीत जरी फिरायची सवलत होती तरी कोणत्याही राजकीय घडामोडीत त्यांना भाग घेता येत नव्ह्ता. "ऑफिशिअल कैदी" असल्यामुळे साहजिकच त्यांच्या पोटापाण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकारची होती.... आणि ती जबाबदारी म्हणजे त्यांना दरमहा मिळणारा रूपये ६०/- हा भत्ता.
त्यांच्या बर्‍याच चरित्रकारांनी आपआपल्या लेखनात "त्यांना ६० रुपये पेन्शन मिळत होती..." असा उल्लेख केला आहे. मात्र रत्नागिरी कलेक्टोरेट गॅझेटमध्ये "रुपये ६०/- अलौन्स" असे शब्द आहेत, त्यामुळे त्यांना "पेन्शन" ऐवजी "उदरनिर्वाह भत्ता" मिळत होता असे म्हणणे जास्त सयुक्तिक होईल.
हा भत्ता १९३७ पर्यंत चालू होता आणि तो "बंद" होण्याचे कारण दुसरेतिसरे कोणते नसून सरकारने सावरकरांची उरलेली शिक्षा माफ केली आणि ते देशात सर्वत्र फिरण्यास आणि भाषण देणे, संघटना बांधणे आदी कामे करण्यास मुक्त आहेत असे सांगण्यात आले. याच साली सावरकर सांगली मार्गे मुंबईला आले आणि हिंदु महासभेचे कार्य जोमाने सुरू झाले. (सांगलीत नथुराम गोडसे त्यांना भेटले आणि तेदेखील मुंबईत महासभेचे कार्य करण्यासाठी आले... पण हा विषय सर्वस्वी वेगळा आहे....)
(२) दोन लाख रुपयांची थैली ~~ ही गोष्ट पूर्ण सत्य आहे की, वीर सावरकर यांना मुंबईत त्यांच्या चाहत्यांनी तसेच हिंदु महासभेवर विश्वास असणार्‍यांनी २ लाखाची थैली दिली... पण त्याला निमित्त होते १९४३ ला झालेली त्यांची "षष्ठ्यब्दपूर्ती". हे एक चांगले निमित्त होते त्यांच्याबाबत प्रेम आणि आदर असणार्‍या लोकात की, त्यांना त्यातून मुंबईत किमानपक्षी आरामात राहाण्यास मिळावे.
पण सावरकरांच्या मनाचा मोठेपणा असा होता की यातील बरीचशी रक्कम त्यांनी "मगोरा" या लोकहितार्थ स्थापन झालेल्या संस्थेला दान दिली. ("मगोरा" = महादेव गोविंद रानडे, सामाजिक कार्यकर्ते). पुढे गांधी हत्या प्रकरणात नेहरु-पटेल द्वयीने त्यांना जाणुनबुजून "आरोपी" केल्यानंतर झालेल्या खटल्यात त्यांना जवळपास ५० हजार खर्च आला होता. जरी त्या स्पेशल कोर्टाने सावरकरांची त्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली, तरी त्यांना कुठलाही कोर्ट खर्च परत मिळाला नाही. पैशांना अशीच दिशा मिळत गेली.... आणि अखेरपर्यंत ते सर्वसाधारण जीवन जगत गेले. लेखनाच्या "रॉयल्टी" द्वारे जी काय थोडीबहुत रक्कम त्यांना मिळत असे तोच एक आधार होता. त्यांच्या घरात रेडिओ देखील आला तो आकाशवाणीने ज्यावेळी "जयोस्तुते" ही त्यांनी लिहिलेले देवीला आवाहन रितसर "शासनमान्य" गीत म्हणून स्वीकारले त्यावेळी.
अजुन खूप काही सांगता येईल. (आता "घरगुती सावरकर" असा धाग्याचा विषय आहे म्हणून सांगतो ~~ सावरकरांच्या मुंबईच्या घरी पूर्णपणे शाकाहारी वातावरण, मात्र तात्यांना मासे फार आवडायचे. पण फक्त आपल्यासाठी कुणी घरात मासे करावेत ही कल्पना त्यांना मान्य नव्ह्ती. अशावेळी अधेमधे माई मंगेशकर (लतादिदींच्या आई..) त्यांना माशाचा डबा स्वतः आणायच्या.)
- इन्द्र्राज पवार

सुभाषचंद्रांनी जपानची मदत घेणं योग्य होतं का ?

सुभाषबाबूंच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेत नाही.तशी शंका घ्यायची योग्यता मिपावरील कोणाही सभासदाची असेल असे वाटत नाही, निदान माझी तरी नाही.पण तरीही त्यांच्या उद्देशाविषयी पूर्ण आदर ठेऊन मी म्हणतो की जपानची मदत घेऊन भारत स्वतंत्र करायच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन मला तरी करता येत नाही.


जपानी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्याला मदत करत होते.पण जपान्यांची पार्श्वभूमी लक्षात घेता त्यांचे इरादे इतके नेक असतीलच असे १००% खात्रीने म्हणता येत नाही.जपान्यांना खरा रस होता पॅसिफिकमध्ये साम्राज्यविस्तार करण्यात.त्यासाठी त्यांनी सुरवात केली हवाई बेटातील पर्ल हार्बरवर हल्ला करून आणि दक्षिण पूर्व आशियात सिंगापूर-इंडोनिशिया या भागातही साम्राज्यविस्तार केला.चीनमधील नानकिंग हे बंदर ताब्यात असणे जपान्यांना महत्वाचे ठरले असते म्हणून त्या शहरावर जपान्यांनी हल्ला केला आणि तिथल्या जनतेवर अनन्वित अत्याचार केले.त्याला रेप ऑफ नानकिंग म्हणतात.

जपान्यांनी ब्रम्हदेशातही १९४२ मध्ये बऱ्यापैकी inroads केले होते.आझाद हिंद सेना स्थापन झाली १९४२ मध्ये-- साधारण त्याच सुमारास आणि सेनेला बऱ्यापैकी आकार आला नंतरच्या काळात. १९४२ मधील सुरवातीचे ब्रम्हदेशावरील आक्रमण जपानी सैन्यानेच आझाद हिंद सेनेच्या मदतीशिवाय केले होते. तिथे जपान्यांना अनुकूल असे फारसे काही नाही.हवा पण रोगट.नैसर्गिक साधनसामुग्री पण फारशी नाही. मला नेहमी प्रश्न पडतो की तरीही ब्रम्हदेशात जपानी का घुसले असावेत? त्याची माझ्या मते कारणे दोन: एक तर ब्रिटिशांविरूध्द strategic depth मिळवायला किंवा पूर्वोत्तर भारतातून बंगालमध्ये घुसायला. Strategic depth कशी?तर जितके इंग्रज जपान्यांच्या area of interest पासून दूर तितके जपान्यांना चांगले.दुसरे म्हणजे बंगालमध्ये कलकत्ता-चितगाव सारखी बंदरे आणि बंगालमध्ये होणारा तांदूळ-ताग अडी-अडचणीच्या वेळी उपयोगी येईल असे जपान्यांना वाटले असेल तर त्यात आश्चर्य वाटू नये.

तेव्हा अधिक strategic depth मिळवायला किंवा भारतातील नैसर्गिक सामुग्रीचा उपयोग करून घ्यायला जपानी भारतात आले असते तर कलकत्ता-चितगावची अवस्था नानकिंगपेक्षा वेगळी झाली असती असे मला वाटत नाही.आणि त्याच प्रक्रियेत त्यांनी आझाद हिंद सेनेला मदत केली याचा हेतू नक्की काय होता?इंग्रजांशी परस्पर आझाद हिंद सेना लढली तर आपल्या डोक्यामागची कटकट कमी हा व्यावहारिक हेतू की भारताला मदत करायची genuine इच्छा?अर्थात हा जरतरचा मामला आहे आणि त्याविषयी नक्की सांगता येणार नाही.पण जपान्यांचा पूर्वेतिहास लक्षात घेता जपान्यांपेक्षा इंग्रज खूपच परवडले असे म्हणायला हवे.सुभाषबाबूंचा हेतू प्रामाणिक होता यात शंका नाही पण भारतात आतपर्यंत घुसलेले जपानी आयत्या वेळा उलटले असते तर?मग एकाबाजूने इंग्रज आणि दुसरीकडे जपानी अशा कात्रीत पकडले जायची शक्यता नव्हतीच का? मला वाटते ती भिती प्रत्यक्षात उतरायची किती शक्यता होती हे माहित नाही पण ती १% तरी असेल तरी was it worth to pay that price?

या कारणामुळे जपान्यांची मदत घेऊन स्वातंत्र्य मिळवायचा प्रयत्न करायला माझ्या पातळीवर तरी समर्थन नाही. मी अगदी पूर्णपणे चुकीचा असेन पण जपान्यांनी भारतात नानकिंगसारख्या कत्तली करणे या कल्पनेनेही माझ्या अंगावर काटा येतो.

----------
जपान्यांनी अंदमान-निकोबार बेटे जिंकली.नेताजींनी त्यांचे नामकरण शहिद आणि स्वराज्य असे केले.पण जपान्यांनी अंदमानातही काही प्रमाणावर कत्तली केल्याच होत्या. (संदर्भ: पान १०२-१०३ ) त्यात म्हटले आहे की इंग्रजांनी अंदमान-निकोबारचा ताबा मिळविण्यापूर्वी ७५० सामान्य लोकांची हत्या केली. १९४५ मधील अंदमानची लोकसंख्या लक्षात घेता ७५० हा आकडा तसा मोठाच नव्हता का?या संदर्भात मागे मी Japanese in Andaman & Nicobar Islands red sun over black water या पुस्तकाची गुगल बुक्समध्ये उपलब्ध असलेली काही पाने वाचली होती.त्या पुस्तकाची सगळी पाने उपलब्ध नाहीत कारण कॉपीराईटमुळे अनेक पाने दिसत नाहीत.तरीही उपलब्ध पानांमधील संदर्भातून कळते की अंदमानमधील हॅवेलॉक बेटावर जपान्यांनी अत्याचार केले होते.आणि या पुस्तकाचे लेखक कोण?तर खडकवासल्याच्या एन.डी.ए मधील प्राध्यापक! तेव्हा हिटलर-जपान्यांच्या वाईट गोष्टी हजार पटीने वाढवून सांगायच्या आणि आपल्या वाईट गोष्टींविषयी काही बोलायचे नाही हा इंग्रज-अमेरिकनांवर होणारा आरोपही त्यांच्यावर करता येणार नाही.


एकूणच काय?की जपान्यांचा उद्देश होता आपल्याला पाहिजे त्या भागात हातपाय पसरायचे आणि कोणी विरोध करेल तर सरसहा कत्तली करायच्या मग ते नानकिंग असो, मांचुरिया असो की अंदमान.समजा जपानी (माझ्या मते) त्यांच्या इंटरेस्टच्या क्षेत्रात--पूर्वोत्तर भारत आणि बंगाल (बांगलादेशासकट) घुसले असते तर आणखी काही वेगळे झाले असते असे म्हणायला काय जागा आहे?

अंदमानातील लोकांच्या हाल-अपेष्टा नेताजींपर्यंत पोहोचल्या होत्या की नाही याची कल्पना नाही.तशा त्या पोहोचल्या असत्या तर ते नक्कीच गप्प बसले नसते.आणि त्या बातम्या नेताजींना समजल्या असतील तर जपान्यांना विरोध करण्याइतकी आझाद हिंद सेना सक्षम नव्हती या कारणाने नेताजी हतबल होते का?अशा जपान्यांच्या हातात कोलीत देणे योग्य होते का?कदाचित त्या काळी अंदमानात काय झाले हे त्यांना कळले नसेलही पण १९३६-३७ पासून जपान्यांनी व्यापलेल्या मांचुरियातही आणि नंतरच्या काळात व्यापलेल्या पॅसिफिकमधील प्रदेशातही काय झाले हे पण १९४२-४३ मध्ये माहित नव्हते? आणि समजा त्या काळी ते कळले नसेल तरीही आज या सगळ्या घटना कळल्यानंतरही केवळ सशस्त्र क्रांतीला समर्थन (किंवा गांधींच्या मार्गाला विरोध) म्हणून आंधळेपणाने जपानची मदत घ्यायचे समर्थन आपण का करतो?

त्यामुळेच नेताजींविषयी पूर्ण आदर बाळगत मी म्हणतो की मला त्यांचा जपान्यांची मदत घ्यायचा मार्ग मान्य नाही.
------------
जपानने मांचुरियावर १९३० च्या दशकातच पूर्वी (मला वाटते १९३२-३३ मध्ये) हल्ला केला होता त्यातूनच जपानची साम्राज्यवादी महत्वाकांक्षा पूर्णपणे लपून राहिलेली नव्हती.तसेच मुसोलिनीचे ऍबिसिनीया (इथियोपिया) वरील आक्रमण १९३५-३६ चे.स्पॅनिश यादवी युद्ध १९३५-१९३६ च्या दरम्यानचे.जनरल फ्रॅन्कोने स्पेनची सत्ता ताब्यात घेतली याचा १९३६ च्या फैजपूर कॉंग्रेसमध्ये निषेधही झाला होता.आणि फ्रॅन्कोला हिटलरने मदतही केली होती हे पण लपून राहिलेले नव्हते.तेव्हा फॅसिस्ट शक्तींविरोधात कॉंग्रेसची भूमिका पहिल्यापासून होती असे म्हणायला नक्कीच वाव आहे. हिटलरने ऑस्ट्रीया घशात घातला मार्च १९३८ मध्ये.तेव्हा या सगळया पार्श्वभूमीवर नानकिंगमधील अत्याचार होते.ती isolated घटना नव्हती की त्याचा फारसा कुठे उल्लेख होणार नाही.

पंडित नेहरू हॅरो आणि केंब्रिजमध्ये शिकलेले होते.ब्रुसेल्समधील साम्राज्यवाद विरोधी परिषदेत त्यांनी भाग घेतला होता.तसेच रशियन राज्यक्रांतीपासून अनेकविध आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास नक्कीच होता.मार्च १९३८ मध्ये पंडित नेहरूंचा लंडनमधील ट्रॅफल्गार स्क्वेअरमध्ये भाषण करतानाचा फोटो मी नेहरूंचे चरित्र वाचले त्यात आहे.म्हणजे मार्च १९३८ मध्ये नेहरू लंडनमध्ये हजर असतील तर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नानकिंगच्या अत्याचाराचा अजिबात थांगपत्ता त्यांना नसेल हे जरा कठिणच वाटते. तसेच नेताजी स्वत: इंग्लंडमधून आय.सी.एस ची परीक्षा उत्तीर्ण झाले होते.तेव्हा त्यांनाही आंतरराष्ट्रीय perspective नक्कीच होता आणि त्यांना या घटनांचे गांभीर्य कळले नसेल असे म्हणता येणार नाही.इतक्या घटना एकामागोमाग एक घडत असतानाही त्यांचे याकडे दुर्लक्ष झाले असेल यावर विश्वास कसा ठेवायचा?त्यांना हिटलरचे Concentration camps माहित नसतील पण जपान्यांनी अत्याचार केले आहेत याचीही त्यांना कल्पना आली नसेल?

बरं जे काही झाले ते झाले.नेताजींनी जे काही केले ते उदात्त भावनेने केले.पण कदाचित नेताजींना माहित नसलेल्या गोष्टी आज माहित झाल्या आहेत.तरीही आपण या मुद्द्यावर का अडून राहतो?

पंडित नेहरू म्हणाले होते की आझाद हिंद सेना भारतात आली तर त्याचा मी तलवारीने विरोध करेन.त्यांच्या या वाक्याची थट्टा उडविणे सोपे आहे.अगदी अविनाश धर्माधिकारींनीही त्याबद्दल नेहरूंवर टिका केली आहे.पण त्या सेनेच्या संगतीने जपानी भारतात घुसतील अशी भिती नेहरूंना वाटली असेल का?नक्की सांगता येणार नाही.पण तशी भिती वाटणे अगदीच निराधार नाही.

जपान्यांनी जे नानकिंगमध्ये केले, अंदमानात केले, इतर अनेक ठिकाणी केले तेच आझाद हिंद सेनेबरोबर भारतात घुसून केले नसतेच असे म्हणायला आधार कोणता?तेव्हा त्या प्रयत्नाला अपयश आले ही एका अर्थी चांगली गोष्ट झाली का?आणि परत वरचाच प्रश्न: १९४२-४३ मध्ये नेताजींनी त्यांना माहित असलेल्या गोष्टी लक्षात घेऊन भारताचे हित लक्षात घेऊनच सगळा त्याग केला.पण नवीन माहिती आपल्याला कळली आहे त्यावरून जपान्यांशी संगत म्हणजे असंगाशी संग नव्हती का?

परकियांची भारतीय स्वातंत्र्यासाठी मदत घेण्यात काहीही गैर नाही.पण त्या परकियाचा आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नको हा महत्वाचा मुद्दा का डावलला जात आहे?नाहीतर भारतीयांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन जपानी (किंवा जपान्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भारतीय) इंग्रजांवर हल्ला करणार.ते यशस्वी झाले तर जपान्यांनाही भारतात इंटरेस्ट असल्यामुळे (याची कारणे आधी मांडलेली आहेत. तसेच ब्रम्हदेशापर्यंत थडकलेले जपानी अचानक भारतीय सीमेवर स्तब्ध उभे राहतील असे मानायचेही काही कारण नाही.त्यातही नेताजींनी मनुष्यबळ भारतीयांकडून उभे केले असले तरी दारूगोळा आणि शस्त्रास्त्रे त्यांना कुठून येत होती?म्हणजे जपानवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणे आले आणि त्यातच जपानचा भारतीय प्रदेशातील इंटरेस्ट हे लक्षात घेता त्याचे परिणाम गोड झालेच असते असे मानायला तुम्हाला वाटते तितका आधार आहे असे वाटत नाही.

त्यातही मला वाटते की परकियांची मदतच घ्यायची तर वेळ पडल्यास रशियाची मदत घेतली असती तर ते जपानची मदत घेण्य़ापेक्षा अधिक श्रेयस्कर ठरले असते. अर्थात त्या वेळी रशिया आपल्याला मदत करायच्या परिस्थितीत नव्हताच पण समजा असता तरी रशियाला भारतात इंटरेस्ट होता याचा पुरावा काय? तसेही रशिया अगदी शेवटपर्यंत इंग्लंडचा शत्रू राहिला असता तरीही चीन हा महाकाय देश ओलांडून भारतात ते यायची शक्यताही नव्हती. तेव्हा:
सर्वात महत्वाचे की ज्या परकियाकडून आपण मदत घेणार आहोत त्याचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नकोत. कत्तली हा मुद्दा महत्वाचा आहेच पण तरीही एखाद्या परकियाचे आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नसतील (उदा. रशिया) तर त्यांनी इतरत्र केलेल्या कत्तलींची डायरेक्ट झळ भारताला लागायची शक्यता कमी होती. जपानबद्दल हे म्हणता येते का?

जपानी Comfort women याविषयी माहिती गोळा करा म्हणजे अनेक काळ्याकुट्ट गोष्टी कळून चुकतील.जर जपानी सैन्याने चीनमध्ये अनेक स्त्रियांना Comfort women म्हणून नेले तर त्यांनी ते भारतात केले नसते हे म्हणायला काय आधार आहे?दुसरी गोष्ट म्हणजे इंग्रज सद्गुणाचे पुतळे नक्कीच नव्हते पण थोड्या काळात त्यांनी घेतलेल्या बळींची संख्या आणि क्रौर्य या बाबतीत ते इंग्रजांपेक्षा कितीतरी पुढे होते.तेव्हा माझा म्हणायचा मुद्दा एकच की इंग्रज वाईट हे मान्य पण त्यांना घालवायला त्यांच्यापेक्षा दहापट वाईट आणि कदाचित अधिक बलिष्ठ शत्रूला घरात घेतले तर त्याचे परिणाम चांगलेच होतील हे म्हणायला काय आधार आहे?

जपानचा नक्की हेतू काय होता?इंग्रजांविरूध्द strategic depth मिळवायला की भारताला स्वतंत्र करायला genuine मदत करणे? मला वाटते की इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून शक्य तितके दूर ठेवावे या कारणासाठी जपानचा भारतात इंटरेस्ट होता.आणि भारतीयांचा इंटरेस्ट इंग्रजांना हरविण्यात होता त्यामुळे एक सोयीचे लग्न (marriage of convenience) म्हणून ते एकत्र आले.तसेच जपान इंडोचायना, मलाया, सिंगापूर अशा अनेक ठिकाणी लढाईत गुंतलेला असल्यामुळे भारताच्या आघाडीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे आणि इंग्रजांना पूर्ण भारतातून कायमचे हाकलवणे हे फारच कठिण आहे हे त्यांना कळले नसेल असे मला तरी वाटत नाही.तेव्हा विजय मिळाला असता तरी जपानी सैन्य इंग्रजांना आपल्या प्रभावक्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी भारताच्या भूभागात तळ ठोकून राहिले असते यात अशक्य काय?तेव्हा जपान्यांना नक्की काय हवे होते?एका ठराविक मर्यादेपर्यंत त्यांचे आणि आपले मार्ग आणि ध्येय सारखे होते हे मान्य.पण पुढे काय?
तसेच अंदमानात जपान्यांनी काय केले हे एका प्रतिसादात लिहिले आहे.तेच त्यांनी भारताच्या इतर भागात केले नसते याला आधार काय या प्रश्नाचे उत्तर मला अजूनही मिळालेले नाही.

जपान्यांनी इतरत्र जो धुमाकूळ घातला त्यावरून भारतातही त्यांनी काही वेगळे केले असते असे मानायला जागा नाही.भारतावर त्यांची राजवट आली नाही हे आपले भाग्यच म्हणायचे.भारतावर ज्या ज्या परकियांचे आक्रमण झाले त्यात अलेक्झांडर सर्वात सुसंस्कृत म्हटला पाहिजे.इंग्रज सुसंस्कृत नसले तरी मोंगल,हूण यांच्यापेक्षा बरेच सोबर होते.लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली त्यावेळीही त्यांच्यावर कोर्टात रितसर खटला दाखल करून त्यांना त्यांची बाजू मांडायची संधी देऊन इंग्रज कायद्याप्रमाणे त्यांना शिक्षा झाली.तसेच सर्व क्रांतिकारकांना फाशी दिले नाही.अनेकांना जन्मठेपेची शिक्षाही केली.तेव्हा विरोध करतोस ना?मग घालतो गोळी अशी तालिबानी किंवा जपानी राजवट त्यांची नव्हती.म्हणूनच इंग्रजांना घालवायला त्यांच्याहून क्रूर जपान्यांची मदत घ्यायला माझा विरोध आहे.
बाकी इंग्रज राज्याचा मी समर्थक नक्कीच नाही.इंग्रज राज्याचे काय किंवा इतर कसलेही जे काही चांगले आणि वाईट हे दोन्ही परिणाम आहेत ते बघावेत आणि त्यावरून मत बनवावे असे मला वाटते.इंग्रज राज्याचे वाईट परिणाम भारतावर झाले हे कोणी नाकारू शकतच नाही.पण एकूण जपान्यांची वर्तणूक बघता इंग्रज म्हणजे lesser evil होते हे माझे मत कायम आहे.आणि असे मत मांडले तर इंग्रज राज्याचा भाट असल्याचा आरोप होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष.

जपानी अत्याचार करण्यात नाझींसारखेच क्रूर होते.त्यांच्या तावडीत भारताचा काही प्रदेश काही काळ राहणे म्हणजे दररोज जालियनवाला बागला लाजवतील अशी हत्याकांडे व्हायला आमंत्रणच नाही का?
शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हे ठिक आहे.पण ते कधी?शत्रूलाही आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नसेल तर.जपान्यांना आपल्या प्रदेशात इंटरेस्ट नव्हता का?तसे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे असे वाटत नाही.आणि अशा शत्रूच्या शत्रूला जवळ करून छावणीत उंट घेण्याप्रमाणे नाही का?
इंग्रजांचे सैन्य फोडून नेताजींनी इंग्रज सत्तेला मुळातून हादरा दिला हे कोणी अमान्य करूच शकणार नाही.माझा मुद्दा केवळ जपान्यांशी संग करण्याबद्दल आहे.

- गिरिश खरे






Monday, May 9, 2011

शंकराचार्याचा तोडगा आणि अयोध्येचा गुंता

सुहास पळशीकर (युनिक फीचर्स)

जवळपास गेली दोन दशके रामजन्मभूमीविषयीच्या वादाचा गदारोळ उठला आहे. शंकराचार्यांनी सुचविलेल्या तोडग्याच्या निमित्ताने जाणूनबुजून अशी हवा निर्माण करण्यात आली होती की आता या प्रकरणी समझोता होऊ शकेल. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने शंकराचार्यांचा तोडगा फेटाळून लावल्यामुळे मुस्लिम समाजाला बदनाम करीत दुसरीकडे कट्टरवादी भूमिका घेण्याचा आगखाऊ हिंदुत्ववाद्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यक्षात हा तोडगा मान्य होण्यासारखा तर नव्हताच. त्यामध्ये राजकीय व्यवहार आणि न्यायाचे तत्त्व या दोहोंचा अभाव होता.
तसे पाहिले तर रामजन्मभूमीचा वाद प्रदीर्घ काळापासून अनिर्णित आहे. स्वातंत्र्योत्तर काळात तो गोठविण्यात आला होता. राजकीय स्वार्थासाठी संघपरिवार आणि भाजप यांनी तो वाद ऐंशीच्या दशकात उकरून काढला. या दरम्यान शंकराचार्यांनी या वादात कधीच फार स्वारस्य दाखविले नाही. नरसिंहराव पंतप्रधान असताना या प्रश्नात शंकराचार्यांचा थोडाबहुत हस्तक्षेप सुरू झाला. भाजप सत्तेवर आल्यापासून (१९९८) गेल्या पाच वर्षांत शंकराचार्यांचा हस्तक्षेप फारसा नव्हताच. आता अचानकपणे एका बाजूला या प्रश्नावर विश्व हिंदू परिषदेची आक्रमक भाषा सुरू झाली असून, दुसरीकडे शंकराचार्यांचा तोडगा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.

प्रत्यक्षात शंकराचार्यांच्या प्रस्तावाचा मुख्य गाभा काय आहे? ‘वादग्रस्त जागा‘ आणि वाद नसलेली जागा एकमेकांपासून वेगळ्या करण्यावर त्यांचा भर असून, वाद नसलेल्या जागेवर राममंदिराची उभारणी करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र तरीही वादग्रस्त जागेविषयी नंतर तडजोड व्हावी असे सुचविले आहे. म्हणजे मूळ प्रश्न निकाली निघतच नाही. आता राममंदिर झाल्याचे श्रेय हिंदुत्ववाद्यांना घेता येईल आणि तरीही मुस्लिम समाजावर दबाव आणायला ते मोकळे राहतील असेच या तोडग्याचे स्वरूप आहे. असा तोडगा मान्य होणे अवघडच आहे. काही काळापूर्वी खुद्द केंद्र सरकारनेही वादग्रस्त नसलेल्या (पण ताब्यात घेतलेल्या) जागी पूजा करू द्यावी अशी मागणी न्यायालयात केलीच होती. शंकराचार्यांचा तोडगा हा त्या सूचनेचाच वेगळा अवतार होता. या दोन्ही प्रयत्नांमध्ये एक समान सूत्र म्हणजे मुस्लिम समाजाला काहीच देऊ न करता त्यांच्याकडून मात्र काही देकार मिळविणे हे आहे. असे तोडगे समझोत्याच्या दिशेने नेऊ शकत नाहीत हे लक्षात घ्यायला हवे.

शंकराचार्यांच्या हस्तक्षेपाला दुर्दैवाने आणखी एक महत्त्वाचा संदर्भ आहे. पुढील वर्षी येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमीचा वाद पुन्हा एकवार पेटविण्यात येत आहे. संघपरिवार, वाजपेयी, अडवाणी आणि विहिंप हे सुसूत्रपणे मुस्लिमांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न करीत आहेत. एकीकडे तोगडियांनी ‘‘हिंदूंना मुस्लिमांच्या सद्‌भावनेची गरज नाही, आम्ही स्वबळावर राममंदिर उभारू‘‘ असे म्हणायचे आणि सिद्धसाधक वाजपेयींनी ‘हा प्रश्न राजकारण्यांना बाजूला ठेवून सोडवला पाहिजे‘, असे सांगत शंकराचार्यांच्या गळ्यात हे झेंगट बांधायचे यात एक संगती आहे. पक्ष म्हणून भाजप दूर राहणार पण मंदिर व्हावे म्हणून शंकराचार्यांना पणाला लावणार असा हा खेळ आहे. जर शंकराचार्यांचा प्रस्ताव मान्य झाला तर मंदिर झाल्याचे श्रेय घेऊन निवडणुकांना सामोरे जायचेआणि तो प्रस्ताव फेटाळला गेला तर मुस्लिमविरोधाचे राजकारण करायचे अशी ही योजना असेल का?

शंकराचार्यांचा प्रस्ताव फेटाळताना मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने दिलेली कारणे मात्र पटण्यासारखी नाहीत. सदरहू लॉ बोर्ड मुस्लिम समाजाच्या भावनांपासून किती दुरावलेले आहे हेच त्याच्या प्रतिक्रियेवरून दिसते. शरियाचा आधार घेत प्रस्ताव फेटाळताना लॉ बोर्ड म्हणते की, मशिदीची जागा ही अल्लाची मालमत्ता असते. तिची विक्री किंवा हस्तांतर होऊ शकत नाही. ही भूमिका दोन कारणांसाठी विघातक आहे. एक तर या भूमिकेमुळे सदर प्रश्नी कोणत्याच तोडग्याला अवसर राहात नाही. म्हणजे हा वाद समझोत्याने सोडवायलाच जणू लॉ बोर्डाने नकार दिला आहे. दुसरे म्हणजे या भूमिकेचा अर्थ असा होतो की, अयोध्याप्रश्नी न्यायालयाने जरी रामजन्मभूमीला अनुकूल निर्णय दिला तरी तो निर्णय ‘इस्लामविरोधी‘ ठरवून सामान्य मुसलमानांना भडकविण्याचा मार्ग कर्मठ मुस्लिम नेत्यांना खुला राहील!

हिंदू व मुस्लिम जमातवाद्यांचे नेहमीच एकमत असते असे सांगितले जाते. रामजन्मभूमीच्या प्रश्नावर त्याचेच प्रत्यंतर येत आहे. अयोध्येला राममंदिर होते की नव्हते हा कायद्याचा प्रश्न नसून भावनेचा प्रश्न आहे, असे विहिंप म्हणते तर सदर जागा ही अल्लाची मालमत्ता असल्याने तिची देवाण-घेवाण होऊ शकत नाही, असे लॉ बोर्ड सांगते. म्हणजे दोघांनाही न्यायालयीन मार्ग मान्य नाही असाच निष्कर्ष निघतो! बरे, शंकराचार्यांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देताना लॉ बोर्डाने समझोत्याची काही भाषा तरी केली आहे का? तर तसेही दिसत नाही. कोणताही समझोता ‘सर्वांना समान वागणूक‘ आणि ‘अल्पसंख्यांच्या भावनांचा आदर‘ या तत्त्वांवर आधारित असावा असे लॉ बोर्ड सांगते. एकीकडे या आधुनिक तत्त्वांचा आग्रह धरायचा आणि दुसरीकडे आधुनिकपूर्व कारणे देऊन समझोत्याचा रस्ता बंद करायचा यातून काय साधणार आहे? लॉ बोर्डाला मुस्लिमांच्या सुरक्षिततेची काळजी नाही, लॉ बोर्डाला चिंता आहे ती मुस्लिम समाजाला सतत असुरक्षित ठेवून कर्मठ नेतृत्व त्या समाजावर लादण्याची. म्हणूनच चुकीच्या युक्तिवादावर आधारित असा निर्णय त्या मंडळाने घेतला आहे. म्हणजे, कोणताच देकार नसलेला शंकराचार्यांचा प्रस्ताव आणि समझोत्याला वाव न ठेवणारा लॉ बोर्डाचा नकार यांनी अयोध्या प्रश्नाचा गुंता वाढवायला मदतच केली आहे.

अयोध्या प्रश्नाचे विविध स्तर आहेत. वादग्रस्त जागेवर दिवाणी कायद्याच्या आधारे कोणाची ‘मालकी‘ आहे हा त्या प्रश्नाचा एक पदर आहे. वहिवाटीच्या तत्त्वाने व पुराव्यांच्या आधारे हा मुद्दा सोडविता येईलही. पण त्याच्या पलीकडे वादग्रस्त जागी पूर्वी मंदिर होते का हा प्रश्न राहीलच. पुरातत्त्वशास्त्राचे अभ्यासक या दुसर्‍या प्रश्नावर मार्गदर्शन करू शकतात. पण एखादा विषय जेव्हा सार्वजनिक वादाचा विषय बनतो तेव्हा शास्त्रीय संशोधनही त्या वाद क्षेत्राचाच एक घटक बनते. एखाद्या संशोधकाने/ गटाने सदर जागी पूर्वी मंदिर होते/ नव्हते, असे म्हटले की त्याचा धर्म, राजकीय कल, हेतू, यांचा पंचनामा होऊन त्याचे निष्कर्ष संशयास्पद ठरविले जातात. तरीही आपण गेली कित्येक वर्षे या भ्रमात आहोत की, शास्त्रीय उत्खननांमधून ‘पुरावा‘ गोळा करून हा प्रश्न सोडविता येईल.

आता तर न्यायालयीन आदेशानेच उत्खनन चालू असून त्याचा अहवाल यायचा आहे. या उत्खननाचा अहवाल संबंधित वादातील बाजूंनाच काय पण तज्ज्ञांनाही मान्य होईल याची काय शाश्वती आहे? पण आपण सगळेच जण विज्ञानाच्या कल्पित निर्णायक शक्तीचे गुलाम असतो. त्यामुळे सदर विज्ञान शाखेत (पुरातत्त्वशास्त्रात) अनिर्णित, अनिश्चित आणि अन्वयार्थनिष्ठ अभ्यासाचेही क्षेत्र असते याच्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्याहीपुढे जाऊन समजा की, मशिदीच्या जागी मंदिर होते/ नव्हते असे पुरातत्त्वशास्त्रीय आधारावर ‘सिद्ध‘ झाले तरी वादमिटेल का? आताच अशी लक्षणे दिसताहेत की पुरातत्त्व खात्याच्या उत्खननाच्या अहवालातून मंदिर असल्याचा स्पष्ट पुरावा मिळणार नाही पण विश्व हिंदू परिषद त्यामुळे काही भूमिका बदलणार नाही. ‘आम्ही गैरसमजुतीमुळे मुस्लिमांना हैराण केले, मशीद पाडली, पण तिथे मंदिर नव्हतेच. सबब आता हे आंदोलन आम्ही संपवतो,‘ असे तोगडिया किंवा अडवाणी म्हणतील का? किंवा त्याउलट, ‘इथे पूर्वी मंदिर होते हे आम्हाला माहिती नव्हते आता ही जागा आम्ही हिंदूंना सुपूर्द करतो‘, असे लॉ बोर्ड किंवा बाबरी कृती समिती म्हणेल का?

सारांश, दिवाणी कायदा किंवा पुरातत्त्वशास्त्र यांच्या आधारे समझोता घडून येणे दुरापास्त आहे. समझोत्याचा आणखी एक मार्ग म्हणजे लवाद नेमण्याचा. काही काळापूर्वी असा प्रस्ताव माजी मुख्य निवडणूक आयुक्त कृष्णमूर्ती यांनी मांडला होता. वादात गुंतलेल्यांनी आपापले प्रतिनिधी व एक संयुक्त प्रतिनिधी लवादावर नेमावेत व लवादाने ठराविक काळात निर्णय द्यावा आणि तो न्यायालयात नोंदवून संबंधितांनी मान्य करावा, असा त्या प्रस्तावाचा आशय होता. त्याऐवजी आता शंकराचार्यांनी थेट एक प्रस्ताव दिला व तो फेटाळण्यात आला आहे, असे बिगर राजकीय प्रस्ताव फेटाळले जाणार हे स्वाभाविकच आहे. कारण गेल्या दोन दशकांत अयोध्या प्रश्न हा राजकीय वादाचा प्रश्न बनला असून त्याचा उपायही राजकीय मार्गानेच शोधावा लागणार आहे.

अयोध्येच्या बाबरी मशिदीबद्दल खरोखरीच वाद आहे का? सामान्य हिंदू व सामान्य मुसलमान यांची गेले दोन दशकभर अशी समजूत करून दिली जात आहे की, हा ‘रामजन्मभूमी‘विषयीचा वाद आहे. पण मग मधूनच त्यात काशी-मथुरेचा मुद्दा कोठून येतो? भारतभरातल्या तीनशे मशिदींचा मुद्दा कोठून येतो? भारतातील मुसलमान राष्ट्रवादी आहेत की नाहीत याचा प्रश्न कोठून येतो? हिंदूंच्या धार्मिक भावनेचा हा प्रश्न असेल तर त्यात राष्ट्रवादाच्या मुद्याची सरमिसळ का केली जाते?आणि तो जर ‘राष्ट्रीय आत्मसन्मानाचा‘ मुद्दा असेल तर त्यावर शंकराचार्य तडजोड करायला का पुढे सरसावतात?

अयोध्या प्रश्नाच्या कायदेशीर आणि पुरातत्त्वशास्त्रीय गुंत्याच्या पलीकडे त्यात दोन मूलभूत प्रश्नांविषयीचा वाद अंतर्भूत होतो. एक प्रश्न आहे- भारतीय राष्ट्रवादाच्या स्वरूपाविषयीचा. रामजन्मभूमीचा वादपेटविणार्‍यांच्या मनात बहुढंगी राष्ट्रवादाविषयी तेढ आहे. त्यांना मुस्लिम समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल शंका आहे. मुसलमानांना वगळणारा असा त्यांचा राष्ट्रवाद आहे. पण आता इथे ज्या मुद्याची चर्चा करायची आहे तो हा प्रश्न नव्हे, मग अयोध्या वादातला दुसरा प्रश्न काय आहे?

हा दुसरा प्रश्न असा आहे की, हिंदूंचे व मुसलमानांचे प्रतिनिधी कोण आहेत? शंकराचार्यांचा तोडगा आणि लॉ बोर्डाचा नकार या खेळात हा मूलभूत मुद्दा गुंतलेला आहे. गेल्या महिनाभरात हा प्रश्न कोणीच विचारला नाही की, शंकराचार्य सर्व हिंदूंचे प्रतिनिधी कसे काय बनले? समजा त्याचा तोडगा इतर हिंदूंना मान्य नसेल तर काय होईल? आणिशंकराचार्यांनी प्रस्ताव दिला तो मुस्लिम लॉ बोर्डाला. हे लॉ बोर्ड मुस्लिमांचे प्रतिनिधी आहे हे तरी कसे ठरले? हिंदू व मुस्लिम या दोन धार्मिक समूहांना त्यांच्या त्यांच्या धर्माच्या आधारे दोन अलग कप्प्यात बंद करून त्यांचे प्रतिनिधित्व करण्याचे राजकारण आज चालू असून त्या राजकारणासाठी शंकराचार्यांच्या प्रतिष्ठेचा खुबीने वापर करून घेण्यात आला आहे. संघ परिवार आणि भाजप यांनी चालविलेली भारतीय समाजाची भावनिक फाळणी पक्की होण्यास या घडामोडीतून हातभारा लागला आहे. काँग्रेस व इतर भाजपविरोधी पक्षांनी नेमक्या या मुद्याकडे दुर्लक्ष केले आहे. हिंदूंमधील काही घटकांना शंकराचार्य हे धर्मगुरू म्हणून आदराचे असले तरीही आपण एक अवघड प्रश्न विचारलाच पाहिजे. तो असा की, शंकराचार्य हिंदूंचे प्रतिनिधी कसे झाले? आणि रामजन्मभूमीचा वाद हिंदू व मुसलमानांच्या अशा प्रतिनिधींवर सोपवून त्याची सलोख्याने सोडवणूक होईल का, याचाही विचार करावा लागेल.
१९८० च्या दशकात संघ परिवाराने रामजन्मभूमीचा मुद्दा राजकीय पटलावर आणून हिंदूंचे भावनिक राजकारण सुरू केले. आता त्या प्रश्नाचा निचरा व्हायचा असेल तर एकच उपाय आहे. तो म्हणजे हिंसेचेआणि द्वेषाचे राजकारण करणारे गट व पक्ष हे आपले प्रतिनिधी नाहीत हे सर्वसामान्य हिंदूंनी सातत्याने नोंदवले पाहिजे. त्याच्या जोडीनेच कर्मठ धर्मगुरू, शरियात दंग असलेले लॉ बोर्ड आणि मुस्लिम अस्मितेचे राजकारण करणार्‍या संघटना हे आपले प्रतिनिधी नाहीत, असे मुसलमान समाजाने नोंदवले पाहिजे.

कदाचित तसे करायला हिंदू व मुसलमान दोघेही तयार होतील. पण त्यांना आपले खोटे प्रतिनिधी हाकलून देण्याच्या कामी बळ द्यायला बिगर-भाजप पक्ष पुढे येतील का?


कांची कामकोटी शंकराचार्य related articles

अधर्माचा पर्दाफाश - http://www.loksatta.com/daily/20041127/lviv02.htm

शंकराचार्य आणि दुढ्ढाचार्य - http://www.loksatta.com/daily/20041127/lokkal.htm

कांची कामकोटीच्या शंकराचार्यांची अटक

चेन्नई : कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद सरस्वती यांना , कांची मठातील एका माजी कर्मचाऱ्याच्या खुनाबद्दल गुरुवारी मध्यरात्री आंध्र प्रदेशात मेहबूबनगरमध्ये नाट्यमयरीत्या अटककरण्यात आली. येथील एका कोर्टाने त्यांची 26 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली असून त्यांच्या जामीन अर्जावर शनिवारी मदास हायकोर्टात सुनावणी होईल.

कांचीतीत शंकर मठात हिशेब व्यवस्थापक म्हणून काम पाहिलेले शंकररामन यांचा तीन सप्टेंबरला खून झाला. मठातील अनेक आथिर्क गैरव्यवहार आपण जगापुढे आणू , अशी धमकी शंकररामनने शंकराचार्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिल्याची माहिती तपासात बाहेर आली. दविड मुन्नेत्र कळघमने या मुद्द्यावरून जयललिता सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हे सरकार शंकराचार्यांना पाठीशी घालत आहे , कारण सरकार त्यांच्या हुकमानुसार चालते , असा दमुकचा आरोप होता.

शंकररामनने मठाला पाठवलेले पत्र , सुरुवातीच्या आरोपींच्या सेलफोन्सवरील संभाषण , मठाचे बँकखाते अशा सर्व अंगांनी तपास सुरू होता. दोन महिने असा चौकशी- तपासाचा घोळ चालवल्यावर अखेर गुरुवारी तामिळनाडू पोलिसांचे कमांडो पथक शंकराचार्यांना अटक करण्यासाठी खास विमानाने बंगलोरला रवाना झाले. पण शंकराचार्य तत्पूवीर्च मेहबूबनगरलारवाना झाले होते. पोलिसांनी तेथे मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांना अटक केली. त्यावेळी शंकराचार्य त्रिकाल पूजा करत होते.

त्यांना विमानाने येथे आणण्यात आले. प्रथम महानगर दंडाधिकारी जी. उत्तमराज यांनी त्यांनानेल्लोर येथील न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

हायकोर्टातही नकार

शंकराचार्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होईपर्यंत त्यांना कोठडीत पाठवू नये , अशी विनंती त्यांचे वकील आय. सुब्रह्माण्यम यांनी मदास हायकोर्टात धाव घेऊन केली. शंकराचार्य यांना मधुमेहअसल्याने दररोज इन्शुलिन द्यावे लागते , असे त्यांनी सांगितले. मात्र हायकोर्टाचे न्या. सुब्रह्माण्यम यांनी विनंती फेटाळली. जामीनअर्जावर शनिवारी सुनावणी होईल. या काळात शंकराचार्यांना कोठडीत पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शंकराचार्यांवरील आरोप निराधार असून , त्यांना अक्षम व्यक्तींच्या साक्षींवरून अटक झाली आहे ,असा बचाव कांची मठाच्या अधिकाऱ्यांनी केला. त्यांचे समाजातील स्थान आणि जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊन त्यांच्यावरील खटल्याचे वार्तांकन करू देऊ नये , ही मठाची विनंतीही हायकोर्टाने फेटाळली. अयोध्या प्रकरणात हिंदू महंत आणि मुस्लिम नेत्यांमध्ये मध्यस्थीकेल्याबद्दल शंकराचार्य गेले वर्षभर चचेर्त होते.

हिंदुत्ववाद्यांचा संताप

या घटनेविषयी भाजप तसेच विश्व हिंदु परिषद व आरएसएस या हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी संताप , तर दमुकने समाधान व्यक्त केले. तर , या अटकेचा तपशील आम्ही मागवला आहे , अशी सावध प्रतिक्रिया केंद सरकारने व्यक्त केली. हिंदूंच्या श्रद्धास्थानाला धक्का लावला ,असा संघ परिवाराचा आणि शिवसेनेचा सूर होता. अटक करण्याइतका पुरेसा पुरावा होता काय ,असा सवाल या सर्वांनी केला आहे.

Thursday, April 21, 2011

बुद्धाचा मृत्यु

बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झाला, असं डॉ. र्‍हिस डेव्हिडस् व काही भारतीय अभ्यासकांचं मत आहे. दीघनिकाय या पाली ग्रंथाचा एक भाग असलेल्या महापरिनिब्बानसूत्तात ही कथा सांगितली आहे.

अजातशत्रूनं विज्ज राज्यावर स्वारी केली, त्यावेळी बुद्ध आपल्या शिष्यांसह तिथेच होता. पावसाळ्याचे दिवस होते, आणि विज्ज राज्यातल्याच एखाद्या विहारात पूर्ण पावसाळाभर राहण्याची बुद्धाची योजना होती. या चार महिन्यांत बुद्धाची प्रकृती फारशी चांगली नव्हती. त्याला सतत तीव्र वेदना होत, असं महापरिनिब्बानसूत्तात म्हटलं आहे.

पावसाळा संपल्यानंतर बुद्ध आपल्या शिष्यांसह पावापुरीस आला. तिथे कुन्द नावाचा एक सोनार राहत होता. कुन्दानं बुद्धाची महती ऐकली होती. बुद्ध रोज आपल्या शिष्यांना संध्याकाळी उपदेश करत असे. कुन्द बुद्धाचं दर्शन घ्यायला संध्याकाळी गेला तेव्हा बुद्धाचं प्रवचन सुरू होतं. बुद्धाचं प्रवचन ऐकून कुन्द विलक्षण प्रभावित झाला, आणि तत्क्षणी त्यानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं. बुद्धानं आपल्या घरी जेवायला यावं, अशी साहजिकच त्याची इच्छा होती. त्यानं बुद्धाला तशी विनंती केली, आणि बुद्धानं कुन्दाचं आमंत्रण स्वीकारलं. अतिशय आनंदात कुन्द आपल्या घरी परतला आणि त्या रात्री जागून कुन्दानं बुद्ध व त्याच्या शिष्यांसाठी अनेक पदार्थ रांधले.

दुसर्‍या दिवशी कुन्द बुद्ध राहत होता त्या आमराईत गेला, व बुद्ध व त्याच्या शिष्यांना सन्मानपूर्वक आपल्या घरी घेऊन आला. बुद्धाला तो म्हणाला,'भगवान, मी आपल्यासाठी आज खास सूकरमद्दव तयार केलं आहे. कृपया त्याचा आस्वाद घ्यावा.' बुद्ध म्हणाला, 'सूकरमद्दव फक्त मला वाढ. इतर कोणाला नको.' कुन्दानं बुद्धाला सूकरमद्दव वाढलं, आणि इतरांना उरलेले पदार्थ वाढले. बुद्धानं जेमतेम काही घास खाल्ले असतील आणि त्याच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्याच वेळी बुद्धानं कुन्दानं उरलेलं सूकरमद्दव एका खोल खड्ड्यात पुरून टाकायला सांगितलं. बुद्धानं आपलं जेवण पूर्ण केलं आणि काही मिनिटांतच बुद्धाला रक्ताचे जुलाब सुरू झाले. प्रचंड हुडहुडी भरली. आनंद, बुद्धाचा पट्टशिष्य, बुद्धाच्या आज्ञेनुसार त्याला कुशीनगरास घेऊन गेला. तिथेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी बुद्धाला महानिर्वाण प्राप्त झालं.

पाली भाषेतली ही कथा एकोणिसाव्या शतकात डॉ. र्‍हिस डेव्हिडस् यांनी इंग्रजीत भाषांतरीत केल्यावर पुन्हा एकदा प्रकाशात आली. तोपर्यंत चिनी व तिबेटी सूत्रग्रंथांचाच दाखला दिला जात असे. महापरिनिब्बानसूत्रात उल्लेखलेलासूकरमद्दव हा पदार्थ नेमका काय, याची चर्चा मग सुरू झाली. सूकरमद्दव या शब्दाचं भाषांतर डुकराचं मऊ मांस असं डॉ. डेव्हिडस् यांनी केलं आहे. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, असा निष्कर्ष काढला गेला. मात्र हाच निष्कर्ष इसवी सनाच्या पाचव्या शतकात बुद्धघोषानंसुद्धा काढला होता. सुमण्गल विलासिनी या आपल्या टीकाग्रंथात बुद्धघोषानं सूकरमद्दवाबद्दल लिहिलं होतं. डुकराचं मऊ मांस या अर्थाबरोबरच त्याने अन्य दोन अर्थही लावले होते. 'काही लोक म्हणतात की सूकरमद्दव म्हणजे गायीच्या मांसापासून तयार केलेला सुपासारखा पातळ पदार्थ. तर काही जणांच्या मते सूकरमद्दव हे एक औषध होतं. भगवान बुद्धांना दीर्घायुष्य मिळावं या हेतूने ते रसायनातील कृतीनुसार तयार केले असावे', असं बुद्धघोषानं लिहिलं आहे.

बुद्धयशस हा बुद्धघोषाचा समकालीन. हा काबुलचा राहणारा. इ. स. ४०२मध्ये तो बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी चीनला गेला. तिथं त्याने दीघनिकायचं चिनी भाषेत भाषांतर केलं. या ग्रंथाचं नाव दीर्घागम. या ग्रंथात बुद्धयशस सूकरमद्दव या शब्दाचंचंदनाच्या झाडाच्या कानांचं सूप असं भाषांतर करतो. चंदनाच्या झाडाचे कान म्हणजे अळंबी. चीनमध्ये आजही झाडावर उगवणार्‍या अळंबीला झाडाचे कान (木耳 - मूएर) म्हणतात.

पण अळंबीचा आणि सूकराचा, म्हणजे डुकराचा, काय संबंध? सूकर म्हणजे डुक्कर आणि मद्दव म्हणजे मऊ. सूकरमद्दवया शब्दाचा एक अर्थ डुकराने मऊ केलेले, म्हणजे लाथाडलेले, असाही होतो. हे वर्णन अळंबीला लागू पडतं. आयुर्वेदिय ग्रंथांमध्येही सूकरकन्द, सूकरपादिका, सूकरेष्ट अशी नावं भाज्यांना दिली आहेतच.

कुन्दानं बुद्धाचं शिष्यत्व पत्करलं होतं. बुद्धाचा प्राणिहत्येला असलेला विरोध त्याला ठाऊक असणारच. त्यानं बुद्धासाठी मुद्दाम डुकराचं मांस शिजवावं, हे त्यामुळे पटत नाही. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बुद्धानं जेवण सुरू केल्यावर काही क्षणांतच त्याला वेदना सुरू झाल्या. अन्नातून होणार्‍या विषबाधेचे परिणाम इतक्या लवकर दिसत नाहीत. बुद्ध हा पावसाळ्यापासूनच आजारी होता. हाच आजार कुन्दाच्या घरी बळावला असणार. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू डुकराचं मांस खाऊन झालेल्या विषबाधेमुळे झाला, हा निष्कर्ष फारसा पटत नाही. त्यामुळे बुद्धाचा मृत्यू नेमकं काय खाऊन झाला, यावर आजही चर्चा सुरू असतात.

http://www.maayboli.com/node/18736?page=1

Friday, April 1, 2011

श्रद्धा या विषयावर दाभोलकर आणि अभ्यंकर यांची जुगलबंदी

पुणे, दि. १८ (प्रतिनिधी) ः ‘श्रद्धा’ या संवेदनशील विषयावर ‘विद्यावाचस्पती’ शंकर अभ्यंकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष ‘विवेकसाथी’ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची आज जोरदार जुगलबंदी झाली. आपापल्या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या या वक्त्यांनी विविध उदाहरणे आणि दाखले देत बुद्धिप्रामाण्यवाद आणि आध्यात्म या विषयांवर केलेल्या प्रभावी वक्तव्यामुळे श्रोते थक्क झाले. या विचारांच्या लढाईत हार मात्र कोणी मानली नाही.
‘साधना’ साप्ताहिक आणि एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन या परिवर्तनवादी संस्थांनी एस. एम. जोशी सभागृहात आयोजित केलेल्या या परिसंवादासाठी मोठी गर्दी झाली होती. दोघांच्याही चाहत्यांनी त्या-त्या वेळी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना प्रोत्साहन दिले. आपला विषय मांडल्यानंतर दाभोलकर आणि अभ्यंकर यांनी एकमेकांचे मुद्दे खोडून काढले.
माणसाच्या संस्कृती, प्रगतीचा इतिहास म्हणजे श्रद्धा तपसाण्याचा इतिहास आहे. ४०० वर्षांपूर्वी गॅलिलिओने दुर्बिणीचा शोध लावून पृथ्वी सूयाार्भोवती फिरते, असा सिद्धांत मांडला, तेव्हा त्याला पाखंडी ठरवून एकान्तवासाची शिक्षा धर्मानेच दिली होती, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘श्रद्धा ही कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष असते, कारण ती धर्मसापेक्ष असते. श्रद्धा म्हणजेच धार्मिक श्रद्धा. १८९७मध्ये सतीप्रथा ही हिंदू धर्मातील श्रद्धा होती. देवराला येथील सतीप्रथेचा अघोरी प्रकार जगाला समजल्यानंतर तीच श्रद्धा अंधश्रद्धा ठरली.’’
श्रद्धा आणि अंधश्रद्धेत १०० टक्के फरक आहे. सात्त्विक श्रद्धा हरविल्याने देशापुढे सारे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याला कारण बुद्धिप्रामाण्यवादीच आहेत, असे सांगून अभ्यंकर म्हणाले, ‘‘सगळ्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. ज्ञानेश्वरांपासून विवेकानंदांपर्यंत ज्या अलौकिक गोष्टींचा अनुभव प्रज्ञावंतांना आला. सर्व संतांनी श्रद्धेविषयी लेखन केले आहे. अशा प्रज्ञावंतांचे शब्दप्रामाण्य हाच ईश्वर असल्याचा पुरावा. तमोगुण, सत्त्वगुण आणि राजस गुण असलेली श्रद्धा असते. तमोगुण कमी होऊन जोवर सत्त्वगुण जागृत होत नाहीत, तोवर जगात शांतता लाभणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
श्रद्धा म्हणजे उत्कट भावनेचे मूल्याधिष्ठित रूप आणि मूल्यविवेक अवनत करते ती अंधश्रद्धा, अशी आपली व्याख्या आहे. श्रद्धा जनसमुदायाची पकड घेते, असे सांगून दाभोलकर यांनी श्रद्धेला तपासणीचा न्याय लावला पाहिजे, असा आग्रह केला आणि विश्वास, अंधविश्वास यांचे सविस्तर विवेचन केले. मनुवादी व्यवस्था स्वीकारणार्‍या आणि वर्णव्यवस्था लादणार्‍या परंपरेने माणूस जन्मजात उच्च किंवा नीच असू शकतो, असे मानले आहे. श्रद्धा ही प्रत्येक व्यक्तीची कवचकुंडले असतात. श्रद्धेला प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, असे ते म्हणाले.
काही गोष्टी श्रद्धेने स्वीकाराव्या लागतात. भावना हा श्रद्धेचा विषय नाही. सानेगुरुजींनीही गायत्री मंत्राचा जप केल्यास पुनर्जन्म लाभतो, असे म्हटले आहे. विज्ञान आणि आध्यात्म ही एकच आहेत. अणूपासून विश्वाची निर्मिती हे विज्ञानाने आता मान्य केले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हे हिंदू संस्कृतीने पूर्वीच सांगितलेले आहे. प्रत्येकाने आपली बुद्धी प्रमाण मानली, तर जगात गोंधळ उडाल्यावाचून राहणार नाही, असे अभ्यंकर म्हणाले.
वैज्ञानिक भाव बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव तपासणे. माझा विवेक हा बुद्धीचा निष्कर्ष आहे; तो देवाचा आदेश नाही, असे सांगून दाभोलकर म्हणाले, ‘‘भावना माणसाची मालक आणि विचार नोकर असतात. कार्यकारणभाव हे माणसाचे मोठे वैशिष्ट्य आहे. महात्मा गांधी परमेश्वर हेच सत्य, असे मानत. एका अनुभवाने ते सत्य हाच परमेश्वर म्हणू लागले.’’

From -